नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा
सबंध महाराष्ट्रातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी दिंडोरी ते मुंबई निघालेल्या लाँग मार्च ला महाराष्ट्र राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्याने सबंध महाराष्ट्रात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि लाँग मार्च चे प्रणेते माजी आमदार जे पी गावीत, डॉ डी एल कराड, डॉ अजित नवले, उदय नारकर, यांचे जोरदार अभिनंदन व स्वागत होत आहे.
लाँग मार्चच्या अभूतपर्व यशानंतर जे पी गावीत यांच्या कर्मभूमीतील सुरगाणा शहरात किसान सभा, डीवायएफआय, जनवादी महिला, एसएफआय या संघटनांनी, तसेच सुरगाणा नगरंचायतीच्या उपनगराध्यक्षा माधवी थोरात, सर्व नगरसेवक, सरपंच उसरपंच आणि उपस्थित नागरिकांनी जोरदार स्वागत केले. आदिवासी परंपरेनुसार कहाळी , तूर, लोकगीतांचे गायन, रावणाच्या ताटीचे नृत्य, करीत सुरगाणा शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. चार ते पाच हजार लोकांच्या सहभागाने संपूर्ण शहरात दोन तास लाल वादळ झंजावत होते. भव्य मिरवणुकीनंतर होळी चौकात विजयी सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेसाठी माकप ची सुरगाणा तालुका कमीटी , जिल्हा कमिटी आणि माकप च्या कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन लोकांना लाँग मार्च मधील मंजूर करण्यात आलेल्या मागण्यांची महिती देउन लोकांना विजयी सभेसाठी आमंत्रित करण्यात आले.
सबंध तालुक्यातून मोठया संख्येने नागरिक या विजयी मिरवणुकीत सहभागी झाले. सभेला संबोधित करताना तालुका सेक्रेटरी सुभाष चौधरी, जिल्हा कमिटीचे नेते सावळीराम पवार, युवा नेते इंद्रजीत गावीत यांनी लाँग मार्च मधील चौदा मागण्यांपैकी सत्तर टक्के मागण्या मान्य झाल्याचे सांगितले. त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांनी संघटित राहून लाभाच्या योजना पदरात पाडून घेण्याचे आवाहन केले. प्रमुख मार्गदर्शन करतांना जे पी गावीत यांनी म्हटले की, मागण्या आणि हक्कासाठी सातत्याने अहोरात्र मेहनत घेतली आहे, वेळोवेळी आपण रास्ता रोको, घेराओ, जेलभरो, घेराव, बंद अशा समाज माध्यमांचा वापर करून आपले प्रश्न शासन दरबारी मांडले, दोन वेळा आपण लाँग मार्च काढला. माञ दोन्ही वेळा आपल्याला आश्वासने दिली आणि आपण विश्र्वास ठेवला. माञ कोणतीही अंमलबजावणी केली नाही आणि आपल्याला फसविले, हा धोका ओळखून आपण यावेळी मागण्यांची अंमलबजावणी त्वरित होत नाही तोपर्यंत मागे हटायचे नाही हा निर्धार करून हा लाँग मार्च प्रभावी बनविण्याचा चंग बांधला. मोर्चातील नागरिकांची संख्या हळूहळू वाढत गेली, ती वीस हजाराच्या पुढे सरकली आणि त्याची दखल शासनाचे घेतली. मोर्चा थांबवावा यासाठी शासनाने माकपच्या शिस्टमंडळाला चर्चस बोलाविले, चर्चा सकारात्मक झाल्यावर चर्चेअंती माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मागण्या मान्य करण्याचा निर्णय घेतला, विधिमंडळाच्या पटलावर मागण्या घेतल्याने हा निर्णय विश्वासू बनला, त्याचा परिणाम म्हणजे शासनाचे आपल्या म्हणण्यानुसार गावं पातळीवर जिल्हा अधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार, या अधिकाऱ्यांना जागेवर पाठविले, तेथील आढावा घेण्याची प्रक्रिया सुरु केली, ही बातमी समजल्यावर मोर्चा मागे घेण्यात आला. या मोर्च्यात आपल्या ताब्यात असलेली फॉरेस्ट ची ताब्यात असलेली संपूर्ण जमीन आपल्याला मिळावी, स्वतंत्र सातबारा मिळावा, त्यावरील जाचक अटी रद्द कराव्यात या सर्व मागण्या मान्य झाल्या, त्यासाठी महाराष्ट्र राज्य वनहक्क समितीवर जे पी गावीत, विनोद नीकोले आणि इतर पदाधिकारी असल्याने यावेळी मी स्वतः पुढाकार घेऊन फॉरेस्ट प्लॉटचा प्रश्न निकाली काढणार असल्याचे सांगितले. याचबरोबर कांद्याचा प्रश्न, वृद्धापकाळ पेन्शन योजनेचा प्रश्न, छोटे मोठे सिमेंट काँक्रिट बंधारे बांधने, देवस्थान, गायरान जमिनी ताब्यात आहेत त्यांना मिळावीत, अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर्स पोलीस पाटील ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मानधनात वाढ झाल्याने त्यांना फायदा नक्कीच होणार आहे. माकपने काढलेल्या मोर्चात तालुक्यातील गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर कामगार यांनी पुढाकर घेतला, सर्व नागरिक मुंबई लाँग मार्च मध्ये स्वतःच्या हिंमतीने निघाले. त्यामुळे आपण शासनाला मागण्या मान्य करून घेण्यास भाग पाडले आणि हीच आपली जमेची बाजू ठरली, असे त्यांनी यावेळी सांगितले.