नाशिक (चांदवड) : परिसरात सोमवारी रात्री ८.१५ च्या सुमारास अवकाळी पावसाने २० ते २५ मिनिटे जोरदार हजेरी लावल्याने उघड्यावरील कांदा, मका, सोयाबीन पीक झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. या अवकाळी पावसामुळे कांदा, अर्ली द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याने तालुक्यातील बळीराजा संकटात सापडला आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. सोमवारी रात्री अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. अर्ली द्राक्षबागांना तडे जाण्याची दाट शक्यता आहे. तर काढणीस आलेल्या कांद्याचे टरफले निघून कांदा खराब होणार आहे. त्याचप्रमाणे करपा, बुरशी, डावण्या यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. शेतकऱ्यांना अतिरिक्त औषध फवारणी करावी लागणार असल्याने आर्थिक बोजा पडणार आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्ग हिरावून घेण्याच्या भीतीने तालुक्यातील शेतकरी चिंतेत आहे.