नाशिक : कांदा प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांकडील बैठक निष्फळ, व्यापारी संपावर ठाम

नाशिक : कांदा प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांकडील बैठक निष्फळ, व्यापारी संपावर ठाम
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकारने कांद्यावरील सीमा शुल्कात ४० टक्क्यांपर्यंत वाढ केल्याने दोन दिवसांपासून जिल्ह्यात कांद्याचे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. बाजार समिती बंदच्या मुद्द्यावरच मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मंगळवारी (दि. २२) शेतकरी प्रतिनिधी व व्यापाऱ्यांची बैठक घेतली. पण बैठकीत तोडगा न निघाल्याने ती निष्फळ ठरली. परिणामी व्यापाऱ्यांनी संपावर ठाम राहण्याची भूमिका घेतली, तर प्रशसानानेही कारवाईचा इशारा दिला.

कांदा निर्यातशुल्क दरवाढीवरून जिल्ह्यात रणकंदन माजले आहे. व्यापाऱ्यांनी कांद्याची खरेदी बंद केल्याने बाजार समित्या ओस पडल्या आहेत. कांद्यामुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली होती. यात जिल्हा कांदा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी भूमिका विशद केली. केंद्राने कोणतीही माहिती न देता दोन दिवसांपूर्वी कांद्यावरील निर्यात शुल्कात ४० टक्के वाढ केली. या निर्णयामुळे बांगलादेशाची सीमा व बंदरात पोहोचलेला ३० हजार टन कांद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचा फटका व्यापाऱ्यांना बसणार आहे. हा कांदा देशांतर्गत निर्यात केल्यास दर कोसळू शकतात. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेला कांदा निर्यातशुल्क न लावता मार्गस्थ करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

जिल्हाधिकारी शर्मा यांनी आपल्या भावना केंद्र व राज्यस्तरावर पोहोचविण्यात येईल, अशी ग्वाही दिली. मात्र, त्यामुळे समाधान न झाल्याने व्यापाऱ्यांनी संप कायम सुरू ठेवण्याची निर्णय घेतला. या सर्व घडामोडीत लिलावात सहभाग न घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.

…तर परवाने रद्द करणार

कांदा लिलाव पूर्ववत सुरू करावे, यासाठी व्यापाऱ्यांना बाजार समित्यांमार्फत नोटीस बजावण्याच्या सूचना केल्या आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलाणी यांनी दिली. कोणतीही पूर्वसूचना न देता व्यापाऱ्यांनी हा बंद पुकारला आहे. त्यामुळे सलग तीन दिवस व्यापाऱ्यांनी बंद कायम ठेवल्यास बाजार समिती कायद्यानुसार त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा मुलाणी यांनी दिला.

…तोपर्यंत लिलाव बंद

निर्यात शुल्कवाढीच्या निर्णयामुळे मुंबईतील जेएनपीटी बंदरासह बांगलादेश सीमा व देशातील विविध बंदरांवर हजारो टन कांद्याचे कंटेनर अडकून पडले आहेत. निर्यातीसाठी पाठविलेल्या या कांद्यावरील निर्यातशुल्क केंद्र सरकार मागे घेत नाही, तोपर्यंत लिलाव बंद ठेवण्याची भूमिका कांदा व्यापारी संघटनेने जिल्हा प्रशासनासमोर मांडली. दरम्यान, दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुमारे ८० हजार क्विंटल कांद्याचे लिलाव बंद आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news