कालांतराने दादाजी यांच्या मुलगा शिवलींग गोंधळे यांनी येथील शेतजमीन कै. काशिनाथ काका पाटील यांना विकली. त्यानंतर मंदिर जिर्ण अवस्थेत झाल्याने साधारणत: १५ वर्षांपूर्वी देवीची मूर्ती ज्या ठिकाणी सापडली होती. त्याच ठिकाणी नवीन मंदिराचे व सभामंडपाचे बांधकाम करुन समोर २१ फुट उंच दिपमाळ बांधण्यात आली आहे. गोंधळे कुटुंबिय उदरनिर्वाहासाठी नाशिक-मालेगाव-मुलुंड इत्यादी ठिकाणी स्थलांतरीत झाल्यानंतर त्यांचे भाऊबंद सदाशिव गोंधळे यांच्या परिवारातील सदस्य नाना गोंधळे हे या मंदिरात भक्तिभावाने पुजा आराधना करतात, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गावातील महिला दरवर्षी मंदिरात श्रध्देने घटींची स्थापना करत आहेत. गावात हे एकमेव देवी मंदिर असल्याने पंचक्रोशीतील भाविक नियमितपणे चैत्र पोर्णिमेला श्रावण महिन्यात तसेच नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने दर्शनासाठी हजेरी लावतात. नवरात्रोत्सवानिमित्त देवीमंदिरावर मोठ्या प्रमाणात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने संध्याकाळी मंदिर उजळून निघाल्याचे मनोहारी दृश्य पाहायला मिळत आहे.