Nashik : निफाडचा पारा पुन्हा घसरला, द्राक्ष बागा वाचविण्याचे आव्हान
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आठवडाभरानंतर निफाडच्या पाऱ्यात घसरण झाली असून शुक्रवारी (दि. २) तालुक्यात ९.५ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे तालुकावासीयांना पुन्हा एकदा थंडीच्या कडाक्याला सामोरे जावे लागत आहे. त्या तुलनेत नाशिकमध्ये गारठा जाणवत नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून निफाडच्या पाऱ्यात घसरण सुरू झाली आहे. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात ९.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून, हवेतील गारठा वाढला आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेने आठ दिवसांपासून उबदार कपडे पुन्हा एकदा कपाटातून बाहेर काढले आहेत. वाढत्या कडाक्यापासून बागा वाचविण्यासाठी द्राक्ष उत्पादकांची धावपळ सुरू आहे. दरम्यान, महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये तालुक्यात ओझर येथे सर्वात नीचांकी ५.६ अंश तापमान नोंदविले गेले होते.
निफाडला गारठा वाढला असताना नाशिकमध्ये दोन दिवसांपासून पारा स्थिर आहे. शुक्रवारी (दि. २) शहरात किमान १३ अंश, तर कमाल तापमानाचा पारा ३०.७ अंशांवर नोंदविण्यात आला. शहर-परिसरात पहाटेची वेळ सोडता संपूर्ण दिवसभर उकाडा जाणवत असल्याने नाशिककरांची तूर्त थंडीपासून सुटका झाली आहे. तसेच उर्वरित जिल्ह्यातही थंडीचा जोर म्हणावा तसा जाणवत नाही. दरम्यान, येत्या आठ दिवसांमध्ये उत्तरेकडून शीतलहरींचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढू शकतो, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.