इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा
आजपर्यंत तीर्थक्षेत्रांची कोणीही यात्रा करतात. परंतु छत्रपती शिवरायांना दैवत मानणार्या घोटीच्या कळसूबाई मित्रमंडळाच्या दक्षिणेतील स्वराज्याच्या किल्ल्याची वारी करून जिंजी किल्ल्यावर भगवा व तिरंगा ध्वज फडकवून गडवारी पूर्ण केली.
कळसूबाई मित्रमंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची वारी केली असून, राज्यभरातील सर्वच किल्ले त्यांनी पिंजून काढून जनजागृती केली आहे. महाराष्ट्रातील साल्हेर किल्ल्यापासून ते तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यापर्यंत अभेद्य किल्ल्यांची साखळी महाराजांनी तयार केली होती. त्यातील बेलाग, अभेद्य जिंजी किल्ला दक्षिणेतील राजधानी होती. हाच जिंजी किल्ला पुढे रायगड पाडावानंतर स्वराज्याची तिसरी राजधानी छत्रपती राजाराम महाराजांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रामध्ये 250 किल्ले आहेत. दक्षिणेतील 112 किल्ले सहजासहजी कोणी पाहिलेच नाही. तंजावरमध्ये मराठ्यांनी सलग 180 वर्षे राज्य केले होते. त्यामुळे या ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती सामान्यपर्यंत पोहोचावी या हेतूने गडावर वारी पूर्ण केली. या वारीत कळसूबाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, रामदास चौधरी, अभिजित कुलकर्णी, गोकुळ चव्हाण, सुरेश चव्हाण, किसन बिन्नर, संजय शर्मा, अलका चौधरी, शांताबाई बिन्नर, सुमित्रा मराडे आदींसह शिवप्रेमी सहभागी झाले होते.
दक्षिण दिग्विजयाची सामान्यांपर्यंत माहिती
या आगळ्यावेगळ्या वारीने दक्षिणेतील स्वराज्यातील किल्ल्यांची माहिती व छत्रपती शिवाजी महाराजांचा दिग्विजय सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्यामुळे या वारीचे सर्वत्र कौतुक होत आहे.