

जळगाव : एमआयडीसीमध्ये कामावर जातो, असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या तरुणाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि.१३) शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. सुरुवातीला पोलिसात अनोळखी असल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, दोन दिवसांपासून मुलगा घरी परतला नसल्याने कुटुंबियांनी तो हरविल्याची तक्रार पोलिसात दिल्यानंतर त्याची ओळख पटली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आकाश सुरेश सपकाळे (वय २६, रा. कांचननगर, ह. मु. प्रजापत नगर) असे मृत तरुणाचे नाव असून त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ असा परिवार आहे.
शहरातील जळगाव ते भादली दरम्यान असलेल्या अपलाईनवरील खांबा क्रमांक ४२०/३० या ठिकाणी १३ सप्टेंबरला रेल्वेच्या धडकेत ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपासधिकारी पोहेकॉ प्रदीप नन्नवरे हे सोशल मीडियासह शहरात बेपत्ता असलेल्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न करीत होते.
याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तालुका पोलिस ठाण्यामध्ये सोमवारी (दि.१५) आकाश सपकाळे हा तरुण बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती प्रदीप नन्नवरे यांना मिळाली. त्यांनी लागलीच सपकाळे कुटुंबियांसोबत संपर्क साधून त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बोलावले. त्याठिकाणी मृताच्या अंगावरील शर्ट व त्याच्या हातावर गोंदलेल्या नावावरुन आकाशच्या काकांसह भावाने त्याची ओळख पटवली. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आकाशचा मृतदेहच समोर दिसल्याने त्याच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.