![जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात कोट्यावधींचा घोटाळा : रामकृष्ण पाटील यांचा आरोप](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F06%2Funnamed-file-345.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
जळगाव पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात असलेल्या शाळांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. बोगस विद्यार्थी संख्या दाखवणे, बोगस संच मान्यता घेणे, बोगस पटसंख्या दाखवून कर्मचारी भरती करणे असे अनेक प्रकार झाले आहेत. यातून कोट्यावधी रुपयांचा मलिदा लाटला गेला असल्याचा आरोप तरळे गावचे सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण पाटील यांनी केला आहे. खालपासून वरपर्यंत सर्वच अधिकारी बरबटल्याचेही ते म्हणाले.
टाकरखेडा गावात शाळा फक्त कागदावरच असून या शाळेच्या नावावर अनुदान मात्र संस्थाचालक खात आहेत. जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुक्यातील वेगवेगळ्या संस्थांच्या शाळांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. बेकायदेशीररित्या शिक्षकांची भरती, विद्यार्थ्यांची बोगस पटसंख्या दाखवून शासनाचे अनुदान लाटण्याचा प्रकार घडला आहे. अनेक संस्था चालक तसेच शिक्षकांची फसवणूक झाल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण पाटील यांच्यासह फसवणूक झालेल्या शिक्षक तसेच संस्थाचालकांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
संबंधित भ्रष्टाचाराबाबत शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार करण्यात आली. मात्र अनेकदा तक्रारी करूनही कारवाई होत नसल्यामुळे निवृत्त न्यायाधीशामार्फत प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा पाडळसे यासह वेगवेगळ्या संस्थांच्या सहा ते सात शाळांमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार तसेच अफरातफर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा गावात अनुदानित शाळा कागदावर दिसून येत आहे. त्याची अनुदानही संस्थाचालक गेल्या काही वर्षांपासून लाटत असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. मात्र या गावात अशी कुठली शाळा नसल्यामुळे गावातील शाळा चोरीला गेली की काय असाच प्रश्न उपस्थित होत आहे. कुठलीही मान्यता नसताना शाळेच्या तुकड्या वाढवणे शिक्षकांची बेकायदेशीर भरती करणे तसेच विद्यार्थ्यांची बोगस पटसंख्या दाखवून शासनाचा अनुदान लाटणे, संस्थाचालकांच्या खोट्या संह्याचा वापर करून अशा पद्धतीने कोट्यावधी रुपयांचा अपहार होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण पाटील यांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केली आहे. मात्र चार महिन्यांपासून तक्रारींचा पाठपुरावा सुरू असून कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे निवृत्त न्यायाधीश यांच्यामार्फत संबंधित प्रकरणाच्या चौकशीचे तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा-