

Jalgaon Vidhan Parishad Voting Percentage
जळगाव : जळगाव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते मतदानाच्या दिवसापर्यंत राजकीय घडामोडींना वेग आला होता. मतदानाच्या दिवशी महायुतीच्या बहुतांश मतदारांनी सकाळी व दुपारपूर्वीच मतदानाचा हक्क बजावला, तर महाविकास आघाडीच्या अनेक मतदारांनी दिवसभर टप्प्याटप्प्याने मतदान केल्याने प्रक्रिया संध्याकाळपर्यंत सुरू राहिली. अखेरीस जिल्ह्यात ९७.७८ टक्के मतदानाची नोंद झाली.
मतदानाच्या आदल्या दिवशी अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी भाजपचे उमेदवार नंदकिशोर (नंदू) महाजन यांना जाहीर पाठिंबा दिल्याने निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले होते. मतदानादरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांनी मतदानासाठी वापरण्यात आलेल्या पेनावर आक्षेप घेत ‘मॅजिक पेन’ वापरल्याचा आरोप केला. या आरोपामुळे काही काळ राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.
चाळीसगाव नगरपरिषदेतील शहर विकास आघाडीच्या १३ नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने त्या केंद्रावर सर्वात कमी मतदान झाले. तर मुक्ताईनगर येथील मतदार ताहिरा बी शेख लुकमान या हज यात्रेसाठी परदेशात असल्याने मतदानासाठी उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्या मतदानाच्या दिवशी मुंबईत पोहोचल्या असल्या तरी वेळेत भुसावळ मतदान केंद्रावर पोहोचणे शक्य झाले नाही.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान १४ मतदारांनी सहाय्यकांच्या मदतीने मतदान केले. जळगाव येथील नलूबाई सोनवणे या व्हीलचेअरवर मतदान केंद्रात दाखल झाल्या आणि त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
भुसावळ मतदान केंद्रावर बोदवड येथील एका नगरसेविकेने सर्वप्रथम मतदान केले. त्यानंतर भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या नगरसेवकांनी गटागटाने मतदानासाठी हजेरी लावली. जामनेरच्या नगराध्यक्ष साधना महाजन तसेच जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
शेंदुर्णी येथील नगरसेवकांना मतदानासाठी विशेष वाहनाने आणण्यात आले होते. शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, ललित कोल्हे, सरिता माळी यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी मतदान केंद्रांवर उपस्थित होते. नशिराबाद येथील नगरसेवक मात्र स्वतःच्या वाहनांतून मतदानासाठी दाखल झाले.
मतदान प्रक्रियेवर जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी नियंत्रण कक्षातून बारकाईने लक्ष ठेवले होते.
टप्प्याटप्प्याने वाढली मतदानाची टक्केवारी
सकाळी १० वाजेपर्यंत जिल्ह्यात ३४.३१ टक्के मतदान झाले होते. दुपारी १२ वाजेपर्यंत ही टक्केवारी झपाट्याने वाढून ८८.१० टक्क्यांवर पोहोचली. दुपारी २ वाजेपर्यंत अमळनेर आणि एरंडोल येथे शंभर टक्के मतदान पूर्ण झाले, तर पाचोरा येथे सर्वप्रथम दुपारी १२ वाजण्यापूर्वीच १०० टक्के मतदानाची नोंद झाली.
संध्याकाळी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत जिल्ह्यात ९७.७८ टक्के मतदान झाले. अमळनेर, फैजपूर, जळगाव, एरंडोल आणि पाचोरा येथे शंभर टक्के मतदान झाले. भुसावळ येथे ९८.३१ टक्के मतदानाची नोंद झाली, तर चाळीसगाव येथे बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर केवळ ७०.७३ टक्के मतदान झाले.
महायुतीच्या मतदारांनी सकाळीच मोठ्या प्रमाणावर मतदान पूर्ण केल्यामुळे सुरुवातीच्या तासांत मतदानाचा वेग अधिक होता. त्यानंतर महाविकास आघाडीच्या मतदारांनी दिवसभर विविध वेळांत मतदान केल्याने प्रक्रिया संध्याकाळपर्यंत सुरू राहिली आणि निवडणुकीतील उत्सुकता अखेरच्या क्षणापर्यंत कायम राहिली.