

जळगाव :
मार्च महिना संपता संपता जळगाव जिल्ह्याला आता सूर्याच्या प्रकोपाचा सामना करावा लागत आहे. गेल्या तीन दिवसांत तापमानाचा पारा तब्बल ४ अंशांनी वाढल्याने जिल्ह्याचा 'तावा' तापू लागला आहे. रविवारी ३३ अंशांवर असलेले तापमान मंगळवारी थेट ३७.६ अंशांवर पोहोचल्याने उन्हाच्या झळांनी नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे.
तापमानाचा 'ग्राफ' वाढता
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २२ मार्च रोजी कमाल तापमान ३३.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. मात्र, अवघ्या ४८ तासांत यात मोठी वाढ झाली आहे. २३ मार्च रोजी पारा ३६ अंशांवर गेला, तर आज २४ मार्च रोजी त्याने ३७.६ अंशांची वेस ओलांडली आहे. किमान तापमानातही वाढ झाली असून रात्रीचा उकाडाही जाणवू लागला आहे.
घामाच्या धारा आणि उकाडा
तापमानासोबतच हवेतील आर्द्रता ६५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने दुपारी प्रचंड उकाडा जाणवत आहे. पावलापावलावर रसवंती गृहे आणि थंड पेयांच्या दुकानांवर गर्दी वाढली आहे. मंगळवारी पावसाची नोंद शून्य असली तरी, वाढत्या आर्द्रतेमुळे नागरिक घामाघूम होत आहेत.
दुपारी शुकशुकाट
सकाळी १० वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा लागण्यास सुरुवात होत आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत भुसावळच्या बाजारपेठेत आणि मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता असून, नागरिकांनी जास्तीत जास्त पाणी पिण्याचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.