

Pandharpur Muktainagar Wari Departure
जळगाव : जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली असताना संत मुक्ताईंच्या पादुकांचे पंढरपूरकडे प्रस्थान होताच पावसाने दमदार हजेरी लावली. या अनपेक्षित पावसामुळे वारकऱ्यांना उन्हाच्या तीव्रतेपासून दिलासा मिळाला आणि दिंडी सोहळ्याचा उत्साह अधिकच वाढला.
कोथळी येथील मंदिरातून बुधवारी (दि.२४) दुपारी एक वाजता नव्याने सजविण्यात आलेल्या रथातून संत मुक्ताईंच्या पादुकांचे पहिल्या मुक्कामासाठी प्रस्थान झाले. याचवेळी आकाशातून पावसाच्या सरी बरसू लागल्या. मुक्ताईंच्या पंढरीवारीचे स्वागत करण्यासाठी निसर्गही सहभागी झाल्याची भावना वारकऱ्यांमध्ये व्यक्त होत होती.
सतत कोसळणाऱ्या पावसातही वारकऱ्यांचा भक्तीभाव आणि उत्साह कायम होता. टाळ-मृदुंगाच्या निनादात, हरिनामाच्या अखंड गजरात आणि "विठ्ठल विठ्ठल"च्या जयघोषात हजारो भाविक आनंदाने पुढे सरकत होते.
या भक्तिमय सोहळ्यास पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन तसेच संजय सावकारे यांनी उपस्थित राहून संत मुक्ताईंचे दर्शन घेतले. त्यांच्यासह हजारो भाविकांनी या वारीत सहभाग नोंदविला.
सुमारे वीस दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात पावसाचे आगमन झाल्याने वारकऱ्यांच्या आनंदाला उधाण आले. शीतल पावसाच्या सरी, हरिनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरण यामुळे परिसर भारावून गेला होता. पावसाच्या साक्षीने संत मुक्ताईंच्या पादुका विठुरायाच्या भेटीसाठी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या असून संपूर्ण मार्गावर श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा संगम अनुभवायला मिळत आहे.