

Raver exam center copy case
जळगाव : राज्यात सध्या बारावीच्या परीक्षा सुरू असून जळगाव जिल्ह्यात मात्र शिक्षण विभागाचा अजब आणि संशयास्पद कारभार समोर आला आहे. रावेर येथील एका परीक्षा केंद्रावर भरारी पथकाने तब्बल ११ विद्यार्थ्यांना कॉपी करताना रंगेहाथ पकडले. मात्र, या कारवाईनंतर अवघ्या अडीच तासांत नाशिक बोर्डाच्या अधिकृत अहवालात जिल्ह्यात 'एकही कॉपी केस नाही' (निरंक) असा जावईशोध लावण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून "कोणाच्या आशीर्वादाने हे 'शून्य' पाढे वाचले गेले?" असा सवाल उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर येथील सरदार जी. जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर भरारी पथकाने अचानक तपासणी केली. यावेळी पथकाला तब्बल ११ विद्यार्थ्यांकडे कॉपीचे साहित्य मिळून आले. पथकाने या ११ जणांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया पूर्ण करून तशी माहिती केंद्र संचालकांकडे सोपवली. नियमानुसार, ही माहिती तातडीने बोर्डाकडे जाणे अपेक्षित होते.
धक्कादायक बाब म्हणजे, भरारी पथकाच्या कारवाईनंतर अवघ्या अडीच तासांत नाशिक बोर्डाच्या वतीने जिल्ह्याचा सुधारित अहवाल प्रसिद्ध झाला. या अहवालात जळगाव जिल्ह्यात एकही कॉपी केस झाली नसल्याचे (निरंक) नमूद करण्यात आले होते. भरारी पथकाने पकडलेले ते ११ विद्यार्थी आणि त्यांच्यावरील कारवाईची कागदपत्रे अडीच तासांत गायब झालीच कशी? असा संतप्त प्रश्न आता विचारला जात आहे. केंद्र संचालकांनी ही माहिती लपवली की बोर्डाच्या स्तरावर काही 'अदृश्य' हालचाली झाल्या, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मीनल करनवाल यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. केंद्र संचालकांनी ही माहिती वरिष्ठांपर्यंत का पोहोचवली नाही आणि अहवालात 'निरंक' कशी दाखवली, याबाबत संबंधित केंद्र संचालकांकडे लेखी खुलासा मागवण्यात आला आहे. हा खुलासा समाधानकारक नसल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.