

जळगाव : भुसावळमध्ये माघारीच्या शेवटच्या दिवशी अनपेक्षित घडामोडी घडल्या. दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने शहरातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. पिंटू कोठारी आणि अजय नागराणी यांच्या बिनविरोध निवडीमुळे भाजपने आपले खाते उघडले आहे. अधिकृत घोषणा मंगळवार (दि.25) रोजी होणार असली तरी सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याने या दोन नगरसेवकांचा विजय निश्चित मानला जातो आहे.
माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेकांनी अर्ज मागे घेतले. काही इच्छुक संपर्कात न राहिल्याने या प्रक्रियेबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या. शेवटच्या क्षणी झालेल्या या उलटफेरामुळे संपूर्ण शहरात उत्सुकता निर्माण झालेली दिसून आली. नगराध्यक्षपदासाठीही दोन महत्त्वाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. यामुळे या पदाची लढत आता अधिक स्पष्ट झाली आहे. कोणाला याचा फायदा मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. या सगळ्या घडामोडींनी भुसावळच्या निवडणुकीला अनपेक्षित वळण मिळाले आहे.