

जळगाव : जिल्ह्याला गुन्हेगारीमुक्त आणि शिस्तप्रिय करण्यासाठी पोलीस प्रशासनाने आता 'अॅक्शन मोड' स्वीकारला आहे. आगामी काळातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि हुल्लडबाजांना लगाम घालण्यासाठी काल, ८ मे रोजी अवघ्या ५ तासांच्या विशेष नाकाबंदीत पोलिसांनी ३९९ बेशिस्त वाहनचालकांना चांगलाच 'प्रसाद' दिला आहे. या धडक कारवाईत ३ लाख ५८ हजार २५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, यामुळे नियम मोडणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
एकाच वेळी संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने काल सायंकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी 'विशेष नाकाबंदी मोहीम' राबवण्यात आली. या मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक, सर्व उपविभागीय अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्यांची पथके रस्त्यावर उतरली होती. तब्बल ३९ अधिकारी आणि १९२ पोलीस अंमलदार अशा २३१ जणांच्या फौजफाट्याने जिल्ह्यातील मोक्याच्या जागा अडवल्या होत्या.
२२५० वाहनांची झाडाझडती; ट्रिपल सीट आणि फॅन्सी नंबर प्लेटवाल्यांची खैर नाही! मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील सुमारे २२५० संशयित वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. यात रस्ते सुरक्षेचे तीन-तेरा वाजवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
ट्रिपल सीट (कलम १२८): १०६ केसेस
विनापरवाना वाहन चालवणे: ९४ व्यक्तींवर कारवाई
फॅन्सी/विना नंबर प्लेट: १२२ वाहने (७८ विना नंबर + ४४ फॅन्सी नंबर)
मद्यधुंद चालक (कलम १८५): ०८ 'डंक अँड ड्राईव्ह'च्या केसेस
जप्ती: गंभीर उल्लंघन करणारे ०१ वाहन पोलिसांनी जप्त केले.
भुसावळ आणि जळगाव शहरात सर्वाधिक 'वसुली' वाहतूक शाखेने या मोहिमेत आक्रमक पवित्रा घेतला होता. भुसावळ वाहतूक शाखेने १०३ केसेसमध्ये सर्वाधिक ६९,१०० रुपये, तर जळगाव शहर वाहतूक शाखेने ६९ केसेसमध्ये ५४,५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. 'कागदपत्रे नाहीत' किंवा 'नियम पाळणार नाही' असे म्हणणाऱ्यांची पोलिसांनी कोणतीही गय केली नाही.