

जळगाव : जिल्ह्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील बंडखोरीचा विषय आता निवळला असला, तरी कोणतीही राजकीय गडबड होऊ नये यासाठी महायुतीकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. रविवारी (१४ जून) आयोजित महायुतीच्या मेळाव्यात उपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांची हॉलमध्ये प्रवेशापूर्वी स्वाक्षरी घेण्याची मोहीम राबविण्यात आली.
विधान परिषद निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात शिवसेना (शिंदे गट) मधील काही पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व बंडखोरीची चर्चा होती. मात्र नाशिकमधील घडामोडींनंतर जळगावातील मतभेदही निवळले असून महायुतीच्या भाजप उमेदवाराला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जळगावातील आदित्य लॉन येथे महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील विविध नगर परिषदांमधील नगरसेवक मोठ्या संख्येने मेळाव्यासाठी दाखल झाले होते.
मेळाव्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक नगरसेवकाची तालुकानिहाय नोंद ठेवण्यात आली. हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी संबंधित नगरसेवकांकडून स्वाक्षरी घेण्यात येत होती. या प्रक्रियेद्वारे नेमके कोण उपस्थित आहे, याची खातरजमा करण्यात येत होती.
विधान परिषद निवडणुकीत मतदानापूर्वी महायुतीतील एकजूट कायम राहावी आणि भविष्यात कोणत्याही प्रकारचा संभ्रम अथवा मतभेद निर्माण होऊ नयेत, यासाठी ही खबरदारी घेतल्याचे बोलले जात आहे. महायुतीच्या मेळाव्यातील ही स्वाक्षरी मोहीम राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.