जळगाव : पुढारी वृत्तसेवा – जळगाव जिल्ह्यात रविवार (दि.२६) रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील 1754 हेक्टर केळी, लिंबू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर 1730 शेतकरी बाधित झाले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली आहे.
जळगाव जिल्ह्यात रविवार (दि.२६) रोजी सायंकाळी जोरदार अवकाळी पावसाचा तडाखा बसला. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील जामनेर, रावेर, यावल, मुक्ताईनगर, जळगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांचे केळी, पपई या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यावल तालुक्यातील वाघेरी ते लंगडा आंबा रोडवरील आंबापाणी या गावामध्ये वादळी वाऱ्यामुळे एक घर पडले असून त्यामध्ये चार जणांचा मृत्यू झालेला आहे. बोदवड तालुक्यात दोन गाय, दोन बैल, दोन म्हैस मृत्युमुखी पडले. यावल, जामनेर, बोदवड, रावेर, मुक्ताईनगर, जळगाव या तालुक्यांमध्ये एक हजार चारशे सात घरांची पडझड झालेली आहे.