

Jalgaon News
जळगाव: जिल्ह्यात बेकायदेशीर अग्निशस्त्रांचा वापर करून दहशत माजवणाऱ्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, त्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने चोपडा तालुक्यातील उमर्टी-मामलदे मार्गावर मोठी कारवाई केली आहे. एका दुचाकीवरून गावठी पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे घेऊन जाणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईमुळे अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.
जळगाव जिल्ह्यात काही समाजकंटक शस्त्रे बाळगून दहशत निर्माण करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाली होती. त्यानुसार एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुप्त सूत्रांकडून खबर मिळाली की, उमर्टी बाजूकडून कृष्णापूरमार्गे दोन तरुण काळ्या रंगाच्या दुचाकीवरून एम एच -19-एस-9450 पिस्तुल घेऊन येत आहेत. माहिती मिळताच गायकवाड यांनी आपल्या पथकाला सापळा रचण्याचे आदेश दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, एलसीबीच्या पथकाने उमर्टी रस्त्यावर पाळत ठेवली. संशयित मोटार सायकल येताना दिसताच पोलिसांनी शिताफीने त्यांना घेराव घातला आणि ताब्यात घेतले. त्यांची पंचांसमक्ष झडती घेतली असता, पोलिसांनाही धक्का बसला. त्यांच्याकडे एक बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तुल आणि तब्बल ५ जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी पिस्तुल, काडतुसे, दुचाकी आणि मोबाईल असा एकूण ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये राहुल कुवरसिंग पावरा (वय २२, रा. उमर्टी, ता. चोपडा) आणि गणपत प्रभाकर किर्तने (वय २८, रा. असोला जवळ बाजार, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) यांचा समावेश आहे. हिंगोलीचा आरोपी चोपडा परिसरात शस्त्रांसह काय करत होता? तो ही शस्त्रे कोणाला विकणार होता की मोठी घटना घडवणार होता? याचा पोलीस कसून तपास करत आहेत. या दोघांविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही उत्कृष्ट कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक राहुल गायकवाड, पीएसआय जितेंद्र वल्टे, विष्णू बिन्हाडे, दिपक माळी, रवींद्र पाटील, विलेश सोनवणे आणि रावसाहेब पाटील यांच्या पथकाने केली आहे.