

जळगाव: जळगाव शहरात ३१ जुलै रोजी झालेल्या १०० मिलीमीटरपेक्षा जास्त मुसळधार पावसाने महानगरपालिकेचा कारभार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची (PWD) पोलखोल केली आहे. पहिल्याच जोरदार पावसात शहराची पुरती दाणादाण उडाली.
गोलानी मार्केट, फुले मार्केट आणि नागरिकांच्या घरांमध्ये सांडपाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. विशेष म्हणजे, ज्यांच्या देखरेखीत जिल्ह्यातील रस्ते आणि गटारींची कामे चालतात, त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या बंगल्यातच पाणी शिरल्याने प्रशासकीय कारभारावर जोरदार ताशेरे ओढले जात आहेत. जिल्ह्यातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण असो की इतर विकासकामे, ही सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दाव्यांनुसार सुरू असतात. मात्र, पावसाच्या पहिल्याच फटक्यात खुद्द पीडब्ल्यूडी अधीक्षक अभियंत्यांचा बंगला अन् परिसर जलमय झाला.
महापौर पाण्यात; व्यापारी उघड्यावर!
अतिक्रमण हटवण्याचा केवळ आभास निर्माण करणाऱ्या महापालिकेला स्वच्छतेचा मात्र पूर्णपणे विसर पडल्याचे उघड झाले आहे. गोलानी आणि फुले मार्केटसारख्या मुख्य व्यापारी केंद्रांमध्ये गटारी तुंबल्याने आणि अतिक्रमामुळे पाणी तुंबून दुकानांत शिरले. रस्त्यांवर साचलेल्या पाण्यातून महापौर फिरताना दिसले. पण हे पाणी थेट दुकानांत शिरलेच कसे? असा संतप्त सवाल व्यापारी विचारत आहेत. रस्त्यांची वरवरची स्वच्छता झाली असली, तरी मार्केटमधील ड्रेनेज लाईन कचऱ्याने तुंबल्यामुळे व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.
'प्लास्टिक आणि अतिक्रमाचा फटका!' : मनपा आयुक्त
या संपूर्ण सावळागोंधळाबाबत मनपा आयुक्त आदित्य जीवन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले "पूर्वी कोणी काय केले याच्याशी मला देणेघेणे नाही. काल मार्केटची पाहणी केली असता ड्रेनेज लाईनमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक अडकल्याचे आणि अतिक्रमामुळे पाण्याचा निचरा अडकल्याचे निदर्शनास आले. तात्काळ स्वच्छता आणि अतिक्रमण हटवण्याच्या सूचना दिल्या असून भविष्यात मार्केटमध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घेतली जाईल."