

जळगांव : जामनेर तालुक्यातील गाडेगावजवळील घाट परिसरात चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, चारचाकी वाहनातून एकूण सहा जण प्रवास करत होते. घाटातील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर वाहन सुमारे सहा वेळा पलटी झाल्याने गाडीचा पूर्ण चक्काचूर झाला. अपघाताचे स्वरूप इतके भीषण होते की घटनास्थळी रक्ताचे डाग आणि वाहनाचे तुकडे विखुरलेले दिसून आले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि आरोग्य विभागाच्या पथकाने तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना त्वरित बाहेर काढून पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) येथे हलविण्यात आले. दरम्यान, मृतांची ओळख आणि अपघाताचे नेमके कारण याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.