

150 Days E-Governance Program
जळगाव : महाराष्ट्र राज्याचे प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या '१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात' जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
मुंबई येथील 'सह्याद्री' अतिथीगृह येथे शनिवारी (दि.28) आयोजित विशेष सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
भारतीय गुणवत्ता परिषद मार्फत करण्यात आलेल्या अत्यंत निकोप व सर्वंकष मूल्यमापनात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने २०० पैकी १८८ गुण प्राप्त केले आहेत. प्रशासकीय कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खालील ७ मुख्य निकषांवर प्रभावी कामगिरी केली:
कार्यालयाचे अद्ययावत व वापरकर्त्यांसाठी सुलभ संकेतस्थळ (वेबसाईट).
‘आपले सरकार’ प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी.
प्रशासकीय कामकाजात ई-ऑफीस प्रणालीचा १०० % वापर.
कामकाजाच्या प्रभावी देखरेखीसाठी कार्यालयीन डॅशबोर्ड.
नागरिकांच्या सुविधेसाठी व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवा.
शासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा नावीन्यपूर्ण वापर.
भौगोलिक माहिती प्रणाली तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर.
उपरोक्त निकषांच्या आधारे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या कामकाजाचे जिल्हाधिकारी रोहन घुगे, जळगाव यांनी सदर कार्यक्रमात सविस्तर सादरीकरण केले.
हे यश जळगाव जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्नांचे व समन्वयाचे फळ आहे. जिल्हा प्रशासनाचे हे यश समस्त जळगावकर नागरिकांना समर्पित आहे. डिजिटल क्रांतीच्या दिशेने पडलेले हे पाऊल जळगाव जिल्ह्याला विकासाच्या एका नवीन उंचीवर घेऊन जाणारे ठरेल.
रोहन घुगे, जिल्हाधिकारी, जळगाव