

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात 'केव्हा काय होईल' याचा काहीच नेम राहिलेला नाही, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा भुसावळकरांनाआला आहे. नाशिक विभागातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 'अ' वर्ग भुसावळ नगरपालिकेच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. थेट जनतेतून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या माजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, प्रहार जनशक्ती संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल छबीलदास चौधरी आणि राष्ट्रवादीचे निखिल चौधरी यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या घडामोडीमुळे भुसावळमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे ढवळून निघाली आहे.
भुसावळ नगरपालिकेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी (शरद पवार गट) च्या उमेदवार गायत्री भंगाळे यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा पराभव केला होता. मात्र, या पराभवानंतर भाजप गोटातून भंगाळे यांच्या जात प्रमाणपत्रावर गंभीर आक्षेप घेण्यात आले. जिल्हा जात पडताळणी विभागाने त्यांचे अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याने त्यांना नगराध्यक्ष पदावरून अपात्र ठरविण्यात आले. या निर्णयाविरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेतली असून, ही न्यायालयीन लढाई सध्या न्यायप्रविष्ट आहे.
न्यायालयातील लढाई सुरू असतानाच गायत्री भंगाळे यांनी थेट सत्ताधारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मात्र, या प्रवेशामुळे भुसावळात एक विचित्र राजकीय पेच निर्माण झाला आहे. कारण ज्या सावकारे दाम्पत्याविरोधात लढून भंगाळे निवडून आल्या, ते सावकारे भाजपमध्ये म्हणजेच महायुतीचा मुख्य घटक आहेत. त्यातच संतोष चौधरी, अनिल चौधरी आणि सावकारे यांच्यातील राजकीय वितुष्ट जिल्ह्याला सर्वश्रुत आहे.
आता एकाच महायुतीच्या छताखाली आल्यानंतर हे कट्टर विरोधक भुसावळच्या विकासासाठी एकत्र काम करणार की अंतर्गत कुरघोडीचे नवे राजकारण पाहायला मिळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. "कालपर्यंत जे डोळ्यात सलत होते, तेच आज महायुतीचे सोबती झाले," अशी उपरोधिक चर्चा सध्या भुसावळच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.