काही तासात मराठा आरक्षणाबाबत तोडगा निघेल : मंत्री गुलाबराव पाटील
जळगाव, पुढारी वृत्तसेवा : मराठा बांधवांना मुख्यमंत्र्यांसह सर्व नेत्यांनी शांततेचे आवाहन केले आहे. मराठा आरक्षणाबाबत उद्या (दि.३०) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत काही तासात आरक्षणाबाबत तोडगा निघेल असा विश्वास मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. नशिराबाद येथील विकास कामांचे त्यांनी भूमिपूजन केले. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
गुलाबराव पाटील म्हणाले, आरक्षण हे शांततेत घ्यायचे आहे. मात्र, हिंसक भूमिका कोणीही घेऊ नये, आरक्षण दिल्यानंतर पुढे ते टिकले पाहिजे त्यासाठी न्यायाचा सल्ला आवश्यक आहे. आज आरक्षण दिलं आणि उद्या कोणी कोर्टात गेलं तर ते तिथले नाही तर पुन्हा सरकारवर रोष येईल. राज्यात मराठा आरक्षणासाठी काही ठिकाणी मराठा बांधव हे आक्रमक झाले असून तरुणांनी आक्रमक न होता शांततेत आरक्षण मिळवून घ्यायचे आहे. आपला आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार तयार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.