![शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होणे अशक्य : डॉ. अमोल कोल्हे](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F01%2F%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हेच जाणता राजा असून, त्यांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. रोजच्या राजकारणात त्यांना ओढू नये. कोणताही पक्ष, खुर्ची, पद त्यांच्यापुढे शून्य आहेत. वादांना अकारण हवा दिली जात आहे. खरे तर महापुरुषांबाबतच्या वक्तव्याला नियमावली असायला हवी, असे विधान राष्ट्रवादीचे खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. कोल्हे यांनी राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या महापुरुषांबाबतच्या वादावरून नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर महापुरुषांबाबत वक्तव्य करताना नियमावली असायला हवी, असेही ते म्हणाले. इतिहास जाज्ज्वल्यपणे पोहोचविणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी लेखक विश्वास पाटील यांनी केलेल्या आरोपांवर आपली भूमिका मांडली. विश्वास पाटील हे लेखनाच्या माध्यमातून व्यक्त होतात आणि मी द़ृष्याच्या माध्यमातून व्यक्त होतो. त्यामुळे ते प्रश्न उपस्थित करू शकतात. स्वराज्याची संकल्पना व्यापक आहे, त्याचा एक भाग धर्म आहे.