नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अहिंसा परमो धर्माचा जयघोष आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देत हजारो नाशिककरांनी शांतता रॅलीत आपला सहभा नोंदविला. शांततेचे प्रतीक असलेल्या श्वेत रंगाचे वस्त्र परिधान करीत धावलेल्या आबालवृद्धांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले.
आयएफएएल जितोद्वारे भव्य अहिंसा रनचे आयोजन हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सकाळी ६ वाजता करण्यात आले होते. याप्रसंगी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल, मनपा आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे, शिक्षणतज्ज्ञ रतन लथ, हेमलता पाटील अहिंसा रनला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. तीन गटांत झालेल्या स्पर्धेत ३ किमी स्पर्धेत ३५००, ५ किमी स्पर्धेत १००० तर १० किलोमीटर स्पर्धेत ८०० स्पर्धकांनी अशा एकूण पाच हजारांपेक्षा जास्त नाशिककरांनी अहिंसा रनमध्ये सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या सुरुवातीला झुंबा नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. स्पर्धेला गोल्फ क्लब येथून सुरुवात होऊन सिबल हॉटेल, एबीबी सर्कल, सातपूर त्यानंतर गोल्फ क्लब येथे स्पर्धेचा समारोप झाला. १० किलोमीटर रनमध्ये पुरुष गटात प्रथम असिफ खान, द्वितीय रोहित यादव, तृतीय महेश फासले, महिला गटात प्रथम राणी मुछेडी, द्वितीय स्तुती एडनवाला, तृतीय ज्योती नागरे यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक वितरणाप्रसंगी उद्योजक अशोक कटारिया, जीतोचे अध्यक्ष ॲड. सुबोध शहा, कल्पना पटणी, हर्षित पहाडे, सतीश पारख, सुमेरकुमार काला, संजय लोढा उपस्थित होते. जितो अध्यक्षा कल्पना पटणी यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. वैशाली जैन यांनी आभार मानले.
ज्येष्ठांचा रनमध्ये सहभाग
९१ वर्षांचे रामचंद्र बधान, ८५ वर्षांचे नारायण वाळवेकर यांनी ३ किमीचा रन पूर्ण केला, तर ८५ बाळकृष्ण अलई यांनी तब्बल १० किलोमीटर 'अहिंसा रन' पूर्ण करून इतरांसमोर नवीन आदर्श निर्माण केला. यावेळी तिघांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.