धुळ्यात बच्छाव यांची आघाडी; भाजपच्या भामरे यांचा फेर मतमोजणीसाठी अर्ज

धुळ्यात बच्छाव यांची आघाडी; भाजपच्या भामरे यांचा फेर मतमोजणीसाठी अर्ज
Published on
Updated on

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळे लोकसभा निवडणुकीत अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांनी २१ व्या फेरी अखेर ३ हजार ८२५ मतांनी आघाडी घेतली. त्यानंतर भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी जिल्हा प्रशासनाकडे फेरमतमोजणीसाठी अर्ज दाखल केला आहे.

धुळे लोकसभेसाठी १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यात प्रमुख लढत काँग्रेसच्या शोभाताई बच्छाव आणि भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांच्यात झाली. धुळे लोकसभेसाठी मंगळवारी (दि.४) एकूण बारा लाख १७ हजार ५२३ असे ६०.२१% मतदान झाले. मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून नगाव बारी येथील शासकीय धान्य गोदामात मतमोजणी सुरुवात करण्यात आली. यावेळी सुरुवातीपासूनच मतमोजणीत नाट्यमय घडामोडी घडत होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये देखील या निकालाबद्दल उत्सुकता वाढीस लागली.

चौथ्या फेरीपासून सुभाष भामरे यांनी आघाडी घेणे सुरू केले. ही आघाडी सातव्या फेरी अखेर २१ हजारापर्यंत पोहोचली. मात्र अकराव्या फेरीमध्ये काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांनी ही आघाडी मोडीत काढीत १३ हजार ५६८ मतांचा लीड घेतला. त्यापुढे हा लीड १९ हजार ७४० पर्यंत बाराव्या फेरीमध्ये पोहोचला. मात्र पुन्हा चौदाव्या फेरीमध्ये हा लीड भाजपने तोडून आघाडी घेतली. या सर्व घडामोडी घडत असतानाच अठराव्या फेरीअखेर दुपारी तीनच्या सुमारास भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरूवात केली. यात डॉ. भामरे यांना ३६६३ मते मिळाली असून मालेगाव मध्यच्या सर्व फेऱ्या संपल्या आहेत. त्यामुळे ते विजयी झाल्याचा दावा करण्यात आला.  दरम्यान ही माहिती सर्व मतदार संघात पोहोचल्याने भारतीय जनता पार्टी ही धुळे लोकसभेच्या जागेवर विजयी झाल्याचे संदेश पोहोचले. मात्र वस्तुस्थिती वेगळी होती.

प्रशासनाने उमेदवारांना मिळालेली मते ही कायदेशीर पद्धतीने तपासणी करून देत असतानाच या आकडेवारी बाहेर येण्यासाठी उशीर झाला. प्रशासनाच्या वतीने दहावी फेरी आली. त्यावेळी कार्यकर्त्यांकडून अठराव्या फेरीपर्यंतचे निकाल अंदाजे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे हा गोंधळ सुरू झाला. दरम्यान प्रशासनाने त्यांच्या वतीने अठराव्या फेरी जाहीर केली. यात काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांना पाच लाख ७९ हजार १७२ मते तर डॉ. सुभाष भामरे यांना ५ लाख ७१ हजार ३८१ मते मिळाल्याचे जाहीर केले. त्यानुसार बच्छाव यांना सुमारे आठ हजाराने आघाडी मिळाल्याचे जाहीर झाले. तर १९ व्या फेरीमध्ये देखील बच्छाव यांना ५ लाख ८२ हजार १४९ तर डॉ. भामरे यांना पाच लाख ७६ हजार ९९४ मते मिळाली. त्यानुसार बच्छाव यांना ५१५५ मतांचा लीड मिळाला .दरम्यान पोस्टल मतदान ४४१८ झाले होते. यात ४०२ आणि २४६ मते अवैध ठरली. उर्वरित ३६७० वैध मतांपैकी बच्छाव यांना १३७४ तर भामरे यांना २००७ मते मिळाली. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी मतमोजणी दरम्यान दोन मशीनच्या डिस्प्ले बंद पडल्यामुळे या मशीन मधील मतांची व्हीव्हीपॅट मध्ये असलेल्या चिठ्ठ्यांची मोजणी करण्याचे निश्चित केले. या चिठ्ठ्यांची देखील मोजणी करण्यात आली. यानंतर बच्छाव यांना ३८२५ मतांची लीड जाहीर झाली. काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांना मिळालेली ही लीड निर्णायक असून आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच याप्रमाणे सहा विधानसभा मतदारसंघातील ३० मशीनच्या चिठ्ठ्यांची मोजणी केल्यानंतर अधिकृतपणे निर्णय जाहीर केला जाणार आहे. मात्र बच्छाव यांचा विजय हा निश्चित झाला असून त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना धनशक्ती विरोधात आपली लढत होती अशी असे स्पष्ट केले आहे. दरम्यान भाजपच्या वतीने माजी महानगर प्रमुख तथा धुळे विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल यांनी प्रशासनाकडे फेर मतमोजणी करण्याचा अर्ज केला आहे. या अर्जावर देखील जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्यासमोर कामकाज होणार असून त्यानंतर निर्णय जाहीर केला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news