![पिंपळनेर : पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामी श्रमदान देताना स्थानिक शेतकरी. (छाया: अंबादास बेनुस्कर)](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F06%2Funnamed-file-271.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पिंपळनेर,जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा – साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्टयातील मोहगाव येथे अनेक वर्षांपासून वन हक्क क्षेत्रातील पाझर तलावात गाळ साचला होता. तलावातील गाळ ग्रामविकास समितीच्या प्रयत्नांनी व पुणे येथील सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या माध्यमातून काढण्यात आला आहे. त्यामुळे तलावाचे खोलीकरण होवून साठवण क्षमता वाढीस लागली आहे.
येथील पाझर तलावात गाळ साचल्यामुळे क्षमतेप्रमाणे पाणी साचत नव्हते. गाळामुळे पाणी लवकर आटले आणि म्हणून पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले होत. गेल्या पावसाळ्यात पावसाचे प्रमाण फारच कमी असल्याने हिरवळ असलेल्या येथील नद्यातही पाण्याची भीषण टंचाई जाणवायला सुरवात झाली होती. रहिवाशांना वापरायला व पिण्यासाठी तसेच जनावरांना देखील पिण्यासाठी पाणी सहजपणे उपलब्ध होत नव्हते. हक्काचे पाणी असावे म्हणून वन हक्क क्षेत्रातील पाझर तलावातील गाळ काढून खोलीकरण करण्याची गरज निर्माण झाली होती. त्यामुळे तलावातील गाळ काढण्याच्या संकल्पनेतून मोहगाव येथील ग्राम विकास समितीच्या प्रयत्नाने तसेच पुणे येथील सेवा सहयोग प्रतिष्ठानकडून जेसीबीच्या दोनशे तास कामासाठी निधी उपलब्ध करण्यात आला. त्याआधारे स्थानिक शेतकऱ्यांनी श्रमदानातून व स्वखर्चातून गाळाची वाहतूक करून गाळ शेतात टाकून घेतला आहे.
या कामाचे उद्घाटन मोहगावचे सरपंच लक्ष्मण महाले यांनी केले. यावेळी उपसरपंच सुरेश चौरे, सरपंच गुलाब गावित यांच्यासह उमेश देशमुख, राजू गावित, राजाराम गायकवाड, मन्साराम गावित, मलेश गायकवाड, हिरामण गावित, विजय चौरे, पोपट महाले यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.
हेही वाचा: