

धुळे : जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पांझरा नदी दुधडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणीपातळी वाढली असून, अक्कलपाडा प्रकल्पात पाण्याची वाढती आवक लक्षात घेता प्रकल्पाचे सात दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत.
सध्या अक्कलपाडा प्रकल्पातून 5230 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून, सोमवार (दि.7) पहाटे ४ वाजल्यापासून टप्प्याटप्प्याने हा विसर्ग वाढवण्यात आला आहे. पाण्याची आवक पुढेही वाढल्यास, पूर्वसूचनेनुसार विसर्गाचे प्रमाण वाढवले जाणार आहे.
पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे आणि अक्कलपाडा प्रकल्पाच्या वरच्या बाजूस असणाऱ्या पांझरा, मालनगाव व जामखेडी प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने अक्कलपाडा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची भर पडत आहे.
या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभाग आणि प्रशासनाने पांझरा नदीच्या दोन्ही तीरावरील गावांतील नागरिक तसेच धुळे शहरवासीयांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. “पांझरा नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी,” असे आवाहन अक्कलपाडा प्रकल्प उपविभागाचे उपविभागीय अधिकारी आणि धुळे मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.