

अंबादास बेनुस्कर
पिंपळनेर : साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्टयात अखेर गुरुवारी (दि.३) दुपारनंतर दमदार पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम दिला. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता साक्री तालुक्यात पावसाचे आगमन झाल्याने खरीप हंगामाला वेग येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
जून महिन्यात २२ व २३ जून रोजी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला होता. त्यानंतर मात्र पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने पेरणीच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. विशेषतः पिंपळनेर शहरासह आदीवासी पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांमध्ये जूनच्या तिसऱ्या आठवड्यानंतर पावसाचा थेंबही पडला नव्हता. त्यामुळे शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले होते.
दरम्यान,दोन दिवसांपूर्वी तालुक्याच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस झाला होता. मात्र पश्चिम भाग कोरडाच राहिल्याने तेथील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. अखेर पश्चिम पट्टघातील अनेक गावांमध्ये दमदार सरी कोसळल्या.या पावसामुळे शेतशिवारांना पुरेसा ओलावा मिळाला,तर ओढे-नालेही वाहू लागल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्टपणे दिसून आले.
काटवान भागासह साक्रीच्या पूर्वेकडील काही गावांमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार सरी बरसल्या.त्यामुळे संपूर्ण तालुक्यात पावसाचा प्रभाव जाणवला असून खरीप हंगामासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. आता सोयाबीन, मका, बाजरी, तूर, मूग, उडीद आदी पिकांच्या पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे.अनेक शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली असून पुरेशा ओलाव्यामुळे पेरणीसाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांनाही दिलासा मिळाला असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. संपूर्ण तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने यंदाचा खरीप हंगाम समाधानकारक ठरेल, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.