

Sakri Land Dispute
पिंपळनेर, साक्री: शेतजमिनीच्या वादातून दोन गटात झालेल्या हाणामारीत कुऱ्हाड आणि लाठ्या-काठ्यांचा सर्रास वापर करुन एकमेकांवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना साक्री तालुक्यातील दरीपाडा आंबापाडा येथे घडली आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात दोन्ही गटाकडून परसस्परविरोधी फिर्यादीवरुन १५ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात, पद्मामकर बापू गायकवाड (रा. आंबापाडा, ता.साक्री), हे सकाळी ९ वाजेच्या सुमारास आंबापाडा शिवारातील त्यांच्या शेत गट क्रमांक ९० मध्ये चुलत भावासह नांगरटीचे काम करीत होते. शेतात काम करीत असताना, पूर्ववैमनस्यातून गावातीलच ८ जणांनी हातात कुऱ्हाड, लाठ्या-काठ्या व लोखंडी हत्यारे घेऊन शेतात अनधिकृतपणे प्रवेश केला. काहीही न बोलता या संशयितांनी संगनमताने पद्मामकर गायकवाड व त्यांचे चुलत भाऊ आणि पत्नी वैशाली पद्माकर गायकवाड यांच्यावर लोखंडी हत्यारे व कुऱ्हाडीने जबर मारहाण करत त्यांना गंभीर जखमी केले. तसेच शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी पद्माकर गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुलाब नामदेव गायकवाड, गोकुळ नामदेव गायकवाड, काशिनाथ नामदेव गायकवाड,शांताराम गोकुळ गायकवाड, धवळू काशिनाथ गायकवाड,रवींद्र गोकुळ गायकवाड, कमलबाई गोकुळ गायकवाड, सुनिता गुलाब गायकवाड (सर्व रा.दरीपाडा पैकी आंबापाडा, ता.साक्री) या आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या गटाकडून गुलाब गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुमचे शेत जिथे आहे, तिथेच नांगरणी करा, असे सांगितले.याचा राग आल्याने संशयितांनी बेकायदेशीर जमाव जमवून संगनमताने गुलाब गायकवाड व त्यांच्या कुटुंबावर हल्ला केला. लोखंडी पाईपने तर इतरांनी हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत जखमी केले. शिवाय जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी पद्माकर बापू गायकवाड, विलास रमण गायकवाड, किरण रमेश गायकवाड, अजय कैलास गायकवाड, संप्रती विलास गायकवाड, कविता पद्माकर गायकवाड, ताईबाई बापू गायकवाड (सर्व रा. दरीपाडा आंबापाडा) यांच्यावर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.