

धुळे : मुंबई आग्रा महामार्गावरून गोवंश वाहतूक करीत असल्याचा प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे. ही तस्करी होत असल्याची माहिती गोरक्षकांनी दिली. त्यामुळे पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग सुरू केला. अखेर चालकाने ही गाडी धुळे तालुक्यातील कापडणे ते सरवड रस्त्यावर सोडून पलायन केले. दरम्यान प्राथमिक चौकशीनंतर चालकासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई आग्रा महामार्गावरून एका पीकअप गाडीमध्ये (क्रमांक एम एच 39 ए डी 23 43) गोवंशाची कत्तलीसाठी वाहतूक होणार असल्याची माहिती काही गोरक्षक आणि पोलिसांना देखील मिळाली. त्यामुळे पोलिसांनी या गाडीचा शोध घेण्यास सुरुवात केली असता ती गाडी त्यांना सरवड फाट्यानजीक आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी या गाडीचा पाठलाग सुरू केला. कापडणे ते सरवड रस्त्यावर चालकाने ही गाडी उभी करून पलायन केले.
दरम्यान पोलिसांनी गाडीमधील सुमारे 40 हजार रुपये किमतीचे पाच गाई आणि एक गोर्हा ताब्यात घेतला असून प्राथमिक चौकशीअंती सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात नंदकिशोर मधुकर माळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नईम अनिस कुरेशी, अनिस मेंबर , नाया कुरेशी, नाया कुरेशी याचा मोठा भाऊ, अजीम कुरैशी( सर्व राहणार सोनगीर), पवन उर्फ बंटी पाटील (राहणार धनुर) या सर्वांच्या विरोधात महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम कलम 5 ,ए 9, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम ११ , १ ड प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.