

Dhule Natural Farming Workshop
धुळे : नैसर्गिक शेती ही कमी खर्चात शाश्वत उत्पादन देणारी पद्धत असून जमिनीची सुपीकता वाढवणे, पाण्याची बचत करणे आणि रासायनिक अवलंबित्व कमी करणे यासाठी ती अत्यंत उपयुक्त असल्याचे प्रतिपादन कृषी विभागाचे संचालक (विस्तार व प्रशिक्षण) रफिक नायकवाडी यांनी केले.
राज्य शासनाचा कृषी विभाग आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक विभागीय “नैसर्गिक शेती व खरीप हंगामपूर्व कार्यशाळा” हिरे भवन येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला नाशिक विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुरज जगताप (धुळे), रवींद्र माने (नाशिक), कुरबान तडवी (जळगाव), दीपक पटेल, नाशिक आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद, तसेच कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक दिनेश नांद्रे आदी उपस्थित होते.
नायकवाडी यांनी सांगितले की, नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांचा निव्वळ नफा वाढतो. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.
यावेळी सुभाष काटकर यांनी नाशिक विभागात राबविण्यात येणाऱ्या ४७५ “नैसर्गिक शेती शाळा” उपक्रमाची माहिती दिली. या उपक्रमाद्वारे शेतपातळीवर प्रशिक्षण देऊन स्थानिक संसाधनांवर आधारित शेती विकसित करण्यावर भर दिला जात आहे. नैसर्गिक शेतीमुळे मातीतील सूक्ष्मजीवांची वाढ, जमिनीची धारण क्षमता सुधारणा आणि दीर्घकालीन उत्पादनक्षमतेत वाढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यशाळेत विविध पिकांवर आधारित तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले. डॉ. उल्हास सुर्वे यांनी जीवामृत, घनजीवामृत आणि बीजामृत यांच्या वापराचे महत्त्व स्पष्ट केले. मका पिकासाठी डॉ. विवेक शिंदे, सोयाबीनसाठी डॉ. जगदीश काथेपुरी, तर कांद्यासाठी डॉ. रविंद्रसिंह पाटील यांनी मार्गदर्शन केले. खरीप हंगामातील कीड व रोग व्यवस्थापनासाठी नैसर्गिक उपाय प्रभावी ठरतात, असे डॉ. पंकज पाटील यांनी सांगितले.
कार्यशाळेतील विशेष आकर्षण म्हणून ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ (प्रत्यक्ष प्रात्यक्षिक) आणि ‘शेती शाळा’ नाटिका सादर करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीतील तंत्रज्ञान प्रत्यक्ष अनुभवता आले. दिनेश पाटील यांनी पीकनिहाय ‘शेती शाळा’ उपक्रम सादर केला.
या कार्यशाळेस नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील सुमारे १,५०० अधिकारी, ४७४ शेतीशाळा आयोजक, समन्वयक आणि शेतकरी उपस्थित होते.