

धुळे : खुनात मयत झालेल्या व्यक्तीची अंत्ययात्रा सुरू असताना जमावाने संबंधित आरोपीच्या घरावर हल्ला केल्याची घटना धुळे तालुक्यातील निकुंभे गावात घडली आहे. या प्रकरणात आता जमावाच्या विरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे तालुक्यातील निकुंभे गावात किरकोळ वादाच्या कारणावरून शानाभाऊ शंभू पाटील (वय 50) या शेतकऱ्यांच्या डोक्यावर दशरथ किसन ठाकरे याने लोखंडी सळईने वार करीत हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात उपचार घेत असताना शानाभाऊ पाटील यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर आरोपी दशरथ ठाकरे हा फरार झाला होता. मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि सोनगीर पोलीस ठाण्याच्या पथकाने त्याला धुळे तालुक्यातील मेहरगाव येथील जंगलामधून अटक केले.
दरम्यान मयत शानाभाऊ पाटील यांची अंत्ययात्रा निकुंभे गावात काढण्यात आली. ही अंत्ययात्रा संबंधित आरोपीच्या वस्तीजवळ आली असता अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या जमावाने मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली. तसेच घराबाहेर असलेल्या वस्तूंची मोडतोड देखील केली. खूनाच्या घटनेमुळे गावामध्ये तणावाचे वातावरण होते. त्यामुळे मयताच्या नातेवाईक तसेच संबंधितांना पोलिसांकडून देखील शांततेचे आवाहन करण्यात आले होते. मात्र दगडफेकीची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली.
या घटनेची माहिती कळाल्याने वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सोनगीर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने निकुंभे गावात पोहोचले. आता पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार चेतन शांतीलाल पाटील, ज्ञानेश्वर निंबा मोरे, शांतीलाल हरी पाटील, राजपाल गिरासे, शांतीलाल कोळी, रतिलाल मोरे गणेश पाटील, समाधान खंडेकर, नामदेव कोळी राजेंद्र पानपाटील, भानुदास मोरे, मनोहर पाटील, आनंदा पानपाटील, जगदीश खंडेकर, रतिलाल पाटील, भुरा पानपाटील यांच्या विरोधात बी एन एस कायदा कलम 189 (2),190,191(2),215 , 221, 324 (4), सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 (1) (3), अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.