

नगर: भारतीय हवामान खात्याने 2 ते 4 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस झाल्यास भीमा, प्रवरा, गोदावरी, घोड, सीना तसेच मुळा धरणातून होणार्या विसर्गामुळे नद्यांची पाणीपातळी वाढू शकते. मुळा नदीपात्रातील कोतूळ येथून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Latest Ahilyanagar News)
नदी, ओढा, नाले काठावरील नागरिकांनी पाणीपातळी वाढल्यास त्वरित सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, शेतीमाल व जनावरांचे संरक्षण करण्यासाठी योग्य नियोजन करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी नागरिकांना केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत पोलिस ठाणे किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.