

नगर तालुका: राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वांबोरी चारी टप्पा दोनच्या कामाला आता वेग येणार असून, या योजनेमुळे १२ गावांतील ३२ तलावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
पांढरीपूल येथे वांबोरी चारीच्या कामाची पाहणी करून कामाचा प्रारंभ आ. अक्षय कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला. मुळा धरणाची पाणीपातळी ८० टक्क्यांच्या पुढे गेली असून, लवकरच वांबोरी चारीला मुळा धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे वांबोरी चारीच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
वांबोरी चारी टप्पा दोनच्या कामाकडे माझे विशेष लक्ष आहे. या टप्प्यात राहुरी, नगर आणि पाथर्डी मतदारसंघातील १२ गावांतील ३२ तलावांचा समावेश आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करून लाभधारक शेतकऱ्यांना पाणी मिळवून देणे माझे प्राधान्य आहे. स्व. आ. शिवाजीराव कर्डिले यांनी वांबोरी चारी योजनेसाठी ९२ कोटींचा निधी मंजूर करून या भागातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या प्रयत्नातून सुरू झालेली ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. काम पूर्ण करताना निधीची प्रशासकीय मंजुरीची किंवा अन्य कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाली तरी ती सोडविण्यासाठी आपण शासनस्तरावर पाठपुरावा करू, अशी ग्वाही आ. अक्षय कर्डिले यांनी दिली.
वांबोरी चारीचे पाणी मिळाल्यानंतर या भागातील शेतीला मोठा आधार मिळणार असून, शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला या योजनेमुळे शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासह आर्थिक परिस्थिती सुधारण्यासही हातभार लागणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचवणे हा केवळ विकासकामाचा भाग नसून त्यांच्या जीवनमानाशी जोडलेला प्रश्न आहे. त्यामुळे वांबोरी चारी टप्पा दोनचे काम कोणत्याही परिस्थितीत रखडू देणार नाही.
लवकरात लवकर काम पूर्ण करून १२ गावांतील ३२ तलावांमध्ये पाणी पोहोचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू, असेही आ. कर्डिले यांनी स्पष्ट केले. वाबोरी चारी टप्पा दोन पूर्ण झाल्यानंतर या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी हे उद्दिष्ट प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. याप्रसंगी लाभधारक गावातील नागरिक, शेतकरी, विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्व. शिवाजी कर्डिले यांचे स्वप्न साकार होणार!
वांबोरी चारी टप्पा दोनचे काम पूर्ण करून या भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे हे स्व. आमदार शिवाजी कर्डिले यांचे स्वप्न होते. यासाठी त्यांनी कायम शासन दरबारी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांचे फलित आता वांबोरी चारी टप्पा दोनच्या माध्यमातून प्रत्यक्षात येत असून, शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचणार आहे.
वांबोरी चारीचे स्वप्न स्व. शिवाजी कर्डिले यांनी पाहिले. ते पूर्ण करण्यासाठी आ. अक्षय कर्डिले यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचविण्यासाठी त्यांचा सुरू असलेला पाठपुरावा पाहता बळिराजाच्या चेहऱ्यावरचा आनंद हीच त्यांच्या कार्याची खरी पावती ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण असणारे लोकनेते म्हणून अक्षय कर्डिले यांची ओळख निर्माण झाली आहे.
सोमनाथ हारेर, माजी सरपंच, खोसपुरी