

नगर: जिल्ह्याच्या उत्तर आणि दक्षिणेतही बुधवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. त्यात वीज कोसळून दोन महिलांचा आणि घर कोसळून एका वृद्धाचा मृत्यू झाला. गायी-म्हशींचाही मृत्यू झाला. शेकडो हेक्टरवरील पिके आणि फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाल्याने नागरिक उघड्यावर पडले आहेत.
संगमनेर तालुक्यात महिलेसह दोघांचा मृत्यू
तालुक्यात बुधवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले. लोहारे येथे वीज पडून लताबाई कैलास सोनवणे (वय 42) यांचा मृत्यू झाला, तर डिग्रस येथे घराची भिंत अंगावर कोसळून महादू माळी (वय 70) यांचा मृत्यू झाला आहे.
तालुक्याच्या पूर्व आणि उत्तरपूर्व भागात बुधवारी सायंकाळी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हाहाकार केला. तालुक्यातील लोहारे-कसारे येथे वीज पडून लताबाई कैलास सोनवणे यांचा मृत्यू झाला. डिग्रस येथे घराची भिंत कोसळून त्याखाली सापडून महादू माळी यांचा मृत्यू झाला. पठार भागातही बुधवारी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यात शेतीसह घरांचे नुकसान झाले.
दरम्यान, आमदार अमोल खताळ यांनी तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधून संबंधित कुटुंबांना शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
डिग्रस येथील महादू दगडू माळी हे घरात असताना वादळी पावसात त्यांचे घर कोसळले. त्यात माळी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेच्या वेळी त्यांची पत्नी घराबाहेरील पडवीत असल्याने त्या सुदैवाने बचावल्या.
पिंप्री लौकी आणि अजमपूर भागात वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, शेतकऱ्यांच्या लिंबू बागा उद्ध्वस्त झाल्या. ज्ञानदेव गंगाधर गिते यांच्या शेतातील 100 लिंबाची झाडे मुळासकट उपटून पडली. तसेच काढणीला आलेला कांदा, मका आणि चारा पिके जमीनदोस्त झाली. सामाजिक कार्यकर्ते भारत पाटील गिते यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली आहे.
शिबलापूर येथील माळेवाडी रस्त्यावर गणपत नागरे यांच्या वस्तीवरील 60 वर्षांपूर्वीचे कडूनिंबाचे जुने झाड विहिरीत कोसळले. यामुळे विहिरीतील दोन इलेक्ट्रिक मोटारींचे नुकसान झाले असून आंब्याची आठ झाडे उखडली. खुराडे उडाल्याने सुमारे 100 कोंबड्यांचा मृत्यू झाला. शेडगाव येथे 6 घरांवरील पत्रे उडाल्याने कुटुंबे उघड्यावर पडली आहेत.
अंभोरे येथील श्री दत्त पावन आश्रमातील भक्तनिवासाचे पत्रे वाऱ्यामुळे उडून दूरवर फेकले गेले. आश्वी स्टेशन परिसरातील मुख्य विद्युत वाहिनीचे पोल कोसळल्याने अनेक गावांतील वीजपुरवठा खंडित झाला असून तो पूर्ववत होण्यास मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे. जाखुरी-कोळवाडे रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
दादाहारी लोभजी गिते, संतोष पालवे यांसह अनेक शेतकऱ्यांचे गोठे झाडे पडल्याने उद्ध्वस्त झाले आहेत. केळी, आंबा, डाळिंब आणि टोमॅटो उत्पादक शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे.
तहसीलदार आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने या भागाची पाहणी करून नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
कोपरगावात वीज पडून महिला ठार
कोपरगाव: तालुक्यात मायगाव देवी, धामोरी, सांगवी भुसार, रवंदे आदी परिसरात बुधवारी सायंकाळी विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. मौजे मायगाव देवी येथे शेतात वीज पडून काम करत असलेल्या मीराबाई सुरेश थोरात (वय 62) यांचा जागीच मृत्यू झाला.
धामोरी येथे प्रकाश कांबळे व अशोक कांबळे यांच्या दोन गाई, तसेच मायगाव देवी येथील विश्वास जाधव यांची एक म्हैस वीज पडून ठार झाली. सांगवी भुसार येथील किसन पवार व गोरख पवार यांच्या घराची पडझड झाली. निलेश जाधव, अशोक जाधव यांच्या पोल्ट्रीचे मोठे नुकसान झाले.
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. उन्हाळ कांदा, द्राक्षबागा आणि चारा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी धावपळ झाली. काढणीला आलेल्या कांद्याचेही नुकसान झाल्याने आधीच घसरत्या कांदा भावामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
काही ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे झाडे कोसळली असून अनेक भागात वीजपुरवठाही विस्कळीत झाला. निवासी नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी सुरू असल्याचे सांगितले.