

संत श्री शेख महंमद महाराज मंदिर जीर्णोद्धार प्रकरण श्रीगोंदा : संत श्री शेख महंमद महाराज मंदिर जीर्णोद्धार आणि वक्फकडे केलेली नोंदणी रद्द करण्यासाठी सुरू केलेले आंदोलन बाराव्या दिवशी स्थगित करण्यात आले. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ घेतल्याचे सांगितले, तर अक्षय महाराज शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रश्नासाठी वेळ दिली असून, आठ दिवसांत याबाबत बैठक घेण्याचे आश्वासन मिळाल्याने रात्रीच्या कीर्तनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले
दि. 17 पासून गाव बंद, तहसीलसमोर धरणे आंदोलन, कीर्तन, भजन कार्यक्रम सुरू होते. यात बाराव्या दिवशी प्रशासनाने निवेदन स्वीकारले. अपर तहसीलदार प्रवीण मुदगल यांनी निवेदन जिल्हाधिकार्यांना पाठवले असल्याचे सांगत, जो अवधी गेला त्याबद्दल प्रशासनातर्फे दिलगिरी व्यक्त केली. दिलेले निवेदनातील मुद्दे जिल्हाधिकारी कार्यालयातील सचिवालय कक्ष अधिकारी यांना पाठवले. त्यावर प्रांताधिकार्यांनी चर्चा केली. दर्गा ट्रस्टची, वक्फ आणि धर्मादायकडे नोंदणी झाली आहे. यावर मुख्यमंत्री यांची वेळ घेतली आहे. चर्चेतून मार्ग निघेल सध्या हे आंदोलन स्थगित करावे, असे सांगितले.
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी शेख महंमद यांचे मंदिर व्हावे ही तालुक्याची मागणी आहे. प्रश्न सोडवावे लागतात. पोलिस, महसूलच्या मार्गाने जावे लागते. चांगले काम करणार्यांवर आरोप होत असतात. त्याकडे दुर्लक्ष करा. वाईट बोलणारे कमी असतात; पण ते चुकीचे विचार मांडून दिशाभूल करतात. मंदिर होईल कुणी मागे राहणार नाही. शेख महंमद महाराज यांचे साहित्य भरपूर आहे. त्या आधारावर सगळे मंदिराच्या बाजूने आहेत. आता अडचणी संपणार असून, परत उपोषण आंदोलन करावे लागणार नाही. लवकर मंदिर जीर्णोद्धार कार्यक्रम व्हावा. शेख महंमद मदतीला येतील. चांगले काम करणार्याला लोक बोलतात. आपण चालत राहू. सगळे एकत्र राहू, असे त्यांनी सांगितले.
या वेळी ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी सर्व आंदोलनाला प्रशासन सामोरे जाते. पण या मोर्चाचे नेतृत्व बंडातात्या, माणिक महाराज, जब्बार महाराज लोकप्रतिनिधी करत होते. पण याचे निवेदन स्वीकारण्यास प्रशासनाने उशीर केला. सर्व देवस्थान, वारकरी यांनी पाठिंबा दिला. शिवसेना अध्यात्मिकचे अक्षय महाराज भोसले उपमुख्यमंत्री यांच्या लक्षात प्रकरण आणून दिले आहे. कोणत्याही परिस्थितीत बैठक लावण्याचे आश्वासन दिले. आंदोलनबाबतीत गावाला काय सांगायचे ते सर्वांनी सांगा. राज्य सरकारने विषय मार्गी लावावा. एक महिन्यात राज्य सरकारने मार्ग काढावा; अन्यथा एक महिन्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहोत. जोपर्यंत मंदिराचा नारळ फुटत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.
बाबासाहेब भोस यांचे बारा दिवस आंदोलन सुरू आहे. कायद्याच्या चौकटीत विषय शासन पातळीवर सुटणार होता. बुधवारी (दि. 30) यावर मंत्रालयात चर्चा होईल. चर्चेने प्रश्न सुटत असेल, तर निर्णय घेऊ. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आंदोलन आहे. यात फाटे फोडू नका, असे सांगितले.
यात्रा कमेटी अध्यक्ष गोपाळ मोटे यांनी वक्फ आणि दर्गा ट्रस्ट रद्द होईपर्यंत शांत बसणार नाही. हिंदूच मंदिराचा उत्सव साजरा करतात; पण गावकर्यांवर आणि यात्रा समितीवर आरोप केले गेले. पण आता मंदिरासाठी आश्वासन मिळाल्याचे सांगितले. या वेळी गावकरी, राजकीय मंडळी, व्यापारी, वारकरी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.