

Sujay Vikhe Patil criticizes Balasaheb Thorat
संगमनेर: 25-25 वर्षे मंत्री राहूनही पाणी देता आलं नाही. मतदारसंघात 200 टँकर धावले. अखेर संगमनेर मतदारसंघातील लोकांनीच बदल घडवला आणि आमदार अमोल खताळ यांना निवडून दिलं. घोषणांनी पोट भरत नाही, प्रत्यक्ष काम केल्याशिवाय जनता खुश होत नाही. ‘भोजापूर’चे पाणी आणणं हे केवळ राजकारण नसून जनतेच्या जगण्याशी संबंधित कामाची आणि कर्तव्याची जबाबदारी असल्याचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
भोजापुरचे पाणी नान्नज दुमाला, तीगाव, सोनोशीपर्यंत पोहोचलं. या निमित्ताने तालुक्यातील गोरक्षवाडी येथे सोमवारी पार पडलेल्या जलपूजन सोहळ्यात ते बोलत होते. (Latest Ahilyanagar News)
डॉ.विखे म्हणाले, निळवंडे डावा कालवा योजना 30-40 वर्षांपासून फक्त कागदावर होती. या दरम्यान अनेकदा बैठका झाल्या, आश्वासने दिली गेली, पण गोरक्षवाडी, संगमनेर आणि आसपासच्या गावांपर्यंत पाण्याचा थेंब पोहोचत नव्हता. जनतेच्या अपेक्षा वारंवार वाढवल्या, पण त्यांची पूर्तता झाली नाही. या प्रकल्पामुळे केवळ शेतीसाठीच नाही, तर पिण्यासाठीही भरपूर पाणी उपलब्ध होणार आहे. हा टप्पा शेतकर्यांच्या जीवनमानात क्रांती घडविणारा आहे.
भोजापुरचं पाणी नानज दुमाला, तीगाव, सोनोशी पर्यंत पाणी पोहोचवलं. गेली 30 वर्षे हा चमत्कार कुणीच घडवू शकला नव्हता. पण शिस्त, नियोजन आणि कटाक्ष ठेवल्यास अशा योजना पूर्णत्वाला जाऊ शकतात. पाणी आणणं हे केवळ राजकारण नसून जनतेच्या जगण्याशी संबंधित कामाची आणि कर्तव्याची जबाबदारी असल्याचे डॉ विखे पाटील यांनी ठणकावून सांगितले.
या प्रकल्पामागे केंद्र सरकारचा मोठा वाटा असल्याचे सांगून पाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून, केंद्र सरकारच्या निधीतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मिळालं. तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पाणी सोडण्याचा ऐतिहासिक कार्यक्रम संपन्न झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकर्यांच्या पाठीशी महायुती सरकार ठाम असल्याचा संदेश मिळाला आहे. जलपूजनानंतर गोरक्षवाडीत जलयात्रा काढण्यात आली.
पोराबाळांनी करून दाखवलं..!
निळवंडे डावा कालवा प्रकल्पाच्या पूर्णत्वाचा प्रवास सांगत, माजी मंत्री थोरात यांचे नाव न घेता चांगलाच समाचार घेतला. पन्नास वर्ष सर्व सतास्थानं असताना सुध्दा तुम्हाला जे करता आल नाही, ते पोराबाळांनीच करून पाणी आणून दाखवल्याचा टोला डॉ. विखे यांनी लगावला.