Ahilyanagar News: कृषी केंद्रात कपाशीच्या बियाण्यांचा तुटवडा
नगर: यंदा मान्सूनपूर्व पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने खरीपाच्या पेरण्यांसाठी शेतकर्यांची लगबग वाढली आहे. त्यात कपाशीच्या बियाणांचा तुटवडा सुरू आहे. कबडडी, 7067 यासह मोजक्या वाणांची मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत असल्याने बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ‘त्याच त्याच’ वाणासाठी हट्ट धरलेला शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, हव्या त्या बियाणांचा तुटवडा, अन्य पिकांचा उत्पादन खर्च आणि उत्पन्न व पिकांचे नियोजन लक्षात घेता शेतकरी कपाशी, सोयाबीनऐवजी तूर आणि मकाकडे वळताना दिसत आहे.
गेल्यावर्षी जिल्ह्यातील शेतकर्यांनी खरीपाची 9 लाख 32 हजार हेक्टरवर पिके घेतली होती. यात प्रामुख्याने तूर 75803 हेक्टरवर पेरणी झाली होती. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र 87 हजार हेक्टर होते, मात्र प्रत्यक्षात 1 लाख 86 हजार हेक्टर सोयाबीनची पेरणी झाली. कपाशीचे 1 लाख 22 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते, प्रत्यक्षात 1 लाख 55 हजार हेक्टरवर कपाशी घेतली होती. तसेच मका 61 हजार क्षेत्रावर घेतली जाईल असा कृषी विभागाचा अंदाज होता, येथेही प्रत्यक्षात 90 हजार हेक्टरवर मका घेतली. एकूणच काय तर खरीपाचे अंदाजित क्षेत्र 6 लाख हेक्टर असताना ते 9 लाखांपर्यंत पोहचले होते.
दरम्यान, गेल्या वर्षी शेतकर्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या सोयाबीनला सरासरी 4 हजारांच्या पुढे भाव मिळाला नाही. तर कपाशीही दोन वषार्ंपासून सात हजाराच्या पुढे ढळता ढळताना दिसत नाही. याउलट वेचणीला 15 रुपये किलोप्रमाणे पैसे मोजावे लागल्याचे दिसले. सोयाबीन आणि कपाशीचे पिकासाठीची मशागत, बियाणे, खते, खुरपणी, काढणी/वेचणी आणि बाजारभाव याचा विचार करता शेतीचे गणित जुळताना दिसत नाही.
यंदा खरीपाचे कृषी विभागाने चांगले नियोजन केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येेरेकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्या मार्गदर्शनात कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे यांनी बियाणांचा काळाबाजार रोखतानाच शेतकर्यांना मार्गदर्शनही केले आहे. दरवर्षी 4 ते 4.5 लाख कपाशी बियाणे पाकीट आवश्यक असताना, यंदा 6 लाख बियाणे पाकीट उपलब्ध आहेत. मात्र शेतकर्यांना कबडी, 7067 अशी काही वाणेच हवी आहेत. सर्व बियाणे एकाच कंपनीचे उपलब्ध नाहीत. त्यामुळे कृषी केंद्रांत बियाणांबाबत तुटवडा जाणवत असल्याचे बोलले जाते. तर काही ठिकाणी कृत्रिम टंचाई असल्याचेही दबक्या आवाजात बोलले जात आहे.
शेतकर्यांनी कपाशीच्या एकाच वाणाचा हट्ट धरू नये. सगळेच वाण हे केंद्र सरकारच्या जीईएसई मान्यताप्राप्त आहेत. त्यामुळे शंका न घेता बियाणे खरेदी करा. बियाणे, खते लिंकींग याबाबत काही तक्रार असल्यास थेट कृषी विभागाशी संपर्क करा.
सुधीर शिंदे, कृषी विकास अधिकारी, जि.प.
मका क्षेत्र 25 हजार हेक्टरने वाढणार
काही शेतकर्यांनी कपाशी आणि सोयाबीनऐवजी यंदा मका करण्याचा विचार केला आहे. मक्याचे पिक घेतले तर 100 ते 120 दिवसात त्याची काढणी होऊ शकते. त्याचा क्विंटलला हमीभावही साधारणतः 2200 च्या आसपास आहे. एकरी 25 ते 30 क्विंटलप्रमाणे 50 हजार रुपये उत्पन्न मिळू शकते. त्यानंतर मकाचे पिकानंतर कांद्यासाठी जमीन पोषक समजली जाते. त्यामुळे पिकांचे नियोजनही सोपे होणार असल्याने शेतकरी मकाकडे वळत आहे. बाजारभावाचा विचार केला तर सरकारने मक्यापासून इथेनॉलनिर्मितीबाबतही धोरण ठरवले आहे. त्यामुळे यातुनही फायदा होऊ शकते, असे बोलले जाते.

