

संगमनेर: तालुक्यातील चंदनापूरी येथील अनेक शेतकऱ्यांनी प्रवरा नदीवरून शेतीसाठी पाणी आणण्यासाठी पाईपलाईन टाकली आहे. मात्र, महावितरणच्या केबल टाकणाऱ्या ठेकेदाराकडून ही पाईपलाईन फुटल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आ. अमोल खताळ यांच्याकडे तक्रार करत संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे.
या पाईपलाईनसाठी शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्ज घेतले, तर काहींनी दागदागिने गहाण ठेवून मोठा खर्च केला. मात्र, ठेकेदाराने मनमानीने काम केले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुणे-नाशिक बायपास महामार्गालगत असणाऱ्या खांडगाव रस्त्याच्या कडेला केबल टाकण्याचे काम महावितरणच्या ठेकेदारामार्फत सुरू होते.
यावेळी होलपास घेत असताना ठेकेदाराकडून दहा केजी सहा इंची अशा तब्बल 5 पाईपलाईन फोडल्या गेल्या आहेत. शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदाराशी जवळपास दोन महिने वारंवार संपर्क साधून नुकसान भरून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर ठेकेदाराने दिलेले पाईप निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.
अखेर शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चातून पाईपलाईन दुरुस्त केली. मात्र, विद्युत मोटार सुरू केल्यानंतर पाईपलाईनचे पाईप अनेक ठिकाणी फुटण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे पाईप देऊन फसवणूक केल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे.
पाण्याअभावी पीकं करपली
पाईपलाईन वारंवार फुटत असल्यामुळे पाण्याअभावी कांदा, गहू, हरभरा तसेच जनावरांच्या चाऱ्याची पिके जळून जात आहे. त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, चंदनापुरी परिसरातील 20 ते 25 शेतकऱ्यांनी आ. अमोल खताळ यांची भेट घेत संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.