

नगर: सरकारने कधीही मराठा समाजाला फसवले नाही, उलट तुमचे आजोबा चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, 1994 मध्ये मंडल आयोगाच्या शिफारशी करताना त्यांना मराठा समाज का आठवला नाही, या पापाचे वाटेकरी कोण आहेत, हे शरद पवारांना जाऊन विचारा, अशी टीका जलसंपदा मंत्री तथा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आ. रोहित पवारांवर केली.
आ. रोहित पवारांनी दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षण मोर्चापूर्वी तीन महिन्यांत एकदाही उपसमितीने बैठक का घेतली नाही, असा प्रश्न केला होता. त्यावर नगर येथे पत्रकारांनी विचारले असताना, मंत्री विखे पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. (Latest Ahilyanagar News)
छगन भुजबळ यांची भेट घेणार
ओबीसी समाजाच्या नाराजीवर भाष्य करताना, विखे पाटील म्हणाले, की ओबीसींना आरक्षण देताना मराठा समाजाने कधी विरोध केला नाही. महाराष्ट्र हे एक पुरोगामी राज्य आहे. सगळ्या समाजाच्या लोकांनी विशाल दृष्टिकोन ठेवून या प्रश्नाकडे पाहण्याची आवश्यकता आहे.
छगन भुजबळ हे ज्येष्ठ आणि प्रभावी नेते आहेत. त्यांच्या मनात काही मुद्दे असतील तर मी त्यांची समक्ष भेट घेईल, त्यांना ज्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण पाहिजे, ते देऊ.
दर सोमवारी आढावा घेण्याचे नियोजन
पडताळणी करताना लोकांना प्रचंड त्रास होतोय, हेलपाटे मारावे लागतात. मधल्या काळात ‘जात पडताळणी’कडे मनुष्यबळ नव्हते. आता अतिरिक्त जिल्हाधिकारी पदाचे 29 जिल्ह्यांमध्ये अध्यक्ष नेमले आहेत. त्यांना टाईमबॉण्ड दिला आहे. प्रत्येक सोमवारी जिल्हाधिकार्यांनी आठवड्यात आलेल्या दाखल्यांवर काय कारवाई झाली, याबाबत आढावा घेण्याबाबत महसूल मंत्र्यांना विनंती करणार आहे.