

पाथर्डी तालुका: शहरातील संत वामनभाऊ नगर व अन्य ठिकाणच्या नागरी समस्यांबाबत वाचा फोडण्यासाठी मंगळवारी (दि. 24) युवासेना शहरप्रमुख सचिन नागपुरे यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी नगरपरिषदेमध्ये पुंगी आंदोलन करून ठिय्या मांडला. आंदोलनकर्त्यांनी वाजवलेल्या पुंग्यांच्या कर्कश आवाजामुळे नगरपरिषद कार्यालयात एकच गोंधळ उडाला. कर्मचारीही काही क्षणांसाठी आचंबित झाले. (Latest Ahilyanagar News)
वामनभाऊ नगर व शहरातील रस्त्याचे सुरू असलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून त्यामुळे नागरिकांच्या पाण्याच्या पाइपलाइन फुटल्या, घरात पावसाचे पाणी शिरले, घंटागाडी येणे बंद झाले, ड्रेनेज गाळाने भरले असून, शहरातील पथदिवे बंद पडले आहेत. या समस्यांना या आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
शहरात गटारांपेक्षा मुतार्यांची गरज आहे. लोकांना वेठीस धरू नका, अशी संतप्त प्रतिक्रिया देव पवार व्यक्त केली. अरविंद सोनटक्के यांनी, भूमिगत गटारीसाठी कोणतीही मागणी नसताना कामे चालू आहेत. हे केवळ ठेकेदाराच्या फायद्यासाठीच सुरू आहे की काय? नगरपरिषद प्रशासनातील अधिकारी कर्मचारी फक्त वेळकाढूपणा करत आहे. लोकांचे कामे वेळेवर होत नाही चालढकल केली जाते, असे सांगितले.
नागापुरे म्हणाले की, वामनभाऊ नगरात चुकीच्या पद्धतीने रस्त्याचे काम सुरू आहे. यामुळे नागरिकांचे हाल होणार आहेत. प्रशासनाने वेळीच लक्ष घालावे, अन्यथा कर्मचार्यांना नागरिकांसमोर रडण्याची वेळ येईल. नवनाथ चव्हाण यांनी, गुजराती ठेकेदाराचा भाजपच्या मोठ्या नेत्याचे नाव पुढे करून मनमानी कारभार सुरू आहे, हे खपवून घेणार नाही, असा इशारा दिला.
भगवान दराडे म्हणाले की, सर्व कामे अंदाजपत्रकानुसारच व्हावीत आणि कोणतेही काम नियमबाह्य करण्यात येऊ नये. अशी मागणी केली.
बंडू पाटील बोरुडे यांनी, जुने बसस्थानकात शौचालय उभारण्याची, तसेच नवी पेठेतील माधवराव निर्हाळी सांस्कृतिक सभागृहातील शौचालय सर्वसामान्यांसाठी खुले करण्याची मागणी केली. योगेश रासने यांनी, काहीही काम सांगितले तरी वेळेवर होत नाही. नागरिक अडचणीत आहेत आणि नगरपरिषद प्रशासनाकडून केवळ टोलवाटोलवी होत असल्याचा आरोप केला.
या वेळी मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी आंदोलकांच्या समस्या ऐकून घेऊन लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.