

पाथर्डी: पाथर्डी पोलिस ठाण्याच्या आवारात सोमवारी रात्री झालेल्या विठ्ठल रावसाहेब खर्चन (रा. आखेगाव, ता. पाथर्डी) यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिस निरीक्षक विलास पुजारी व इतर कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी पोलिस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
या घटनेनंतर सोमवारी रात्रीपासूनच प्रा. चव्हाण यांनी प्रकरणाचा पाठपुरावा करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी लावून धरली होती. उपजिल्हा रुग्णालय तसेच पाथर्डी पोलिस ठाणे परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंगळवारी उपजिल्हा रुग्णालयापासून मोर्चा काढून आंदोलकांनी पोलिस ठाण्यात प्रवेश केला आणि मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. दरम्यान, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यास भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. मात्र सायंकाळपर्यंत कोणताही तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच होते.
सोमवारी रात्री औरंगपूर येथील एका महिलेने अत्याचाराची तक्रार घेऊन खर्चन यांच्यासह पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. यावेळी संबंधित महिला व तिच्या मुलाने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच गोंधळात खर्चन खाली पडले. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच प्रा. किसन चव्हाण यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली आणि संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय अंत्यसंस्कार होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर मंगळवारी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला.
आंदोलकांशी उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू व शेवगावचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी चर्चा केली. या वेळी राजगुरू आणि चव्हाण यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर चव्हाण यांनी पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारातच धरणे आंदोलन सुरू केले. आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष पप्पू बोर्डे, किसन आव्हाड, अरविंद सोनटक्के, निखिल खर्चन, नारायण शेकडे, प्यारेलाल शेख, वसंत बोर्डे, अंबादास आरोळे, गणेश चितळकर, संजय खर्चन आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी आंदोलकांना खर्चन यांच्या मृत्यूची चौकशी त्रयस्थ अधिकाऱ्यामार्फत केली जाईल; तसेच दोषी आढळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. मात्र चौकशी पूर्ण होईपर्यंत पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांची बदली करण्याची मागणी आंदोलकांनी कायम ठेवली. त्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली. दरम्यान, विठ्ठल खर्चन यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सायंकाळी अहिल्यानगर येथे हलविण्यात आला. या आंदोलनामुळे पोलिस ठाणे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.