NCP protest over garbage disposal
नगर: पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया यांसारखे साथरोग पसरू नयेत, यासाठी स्वच्छता अत्यावश्यक आहे. मात्र, कचरा संकलन वेळेवर होत नसल्यामुळे अहिल्यानगर शहरात ठिकठिकाणी कचर्याचे ढिगारे पडून आहेत. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. महापालिका प्रशासनाने या प्रश्नांची गंभीर दखल घ्यावी अन्यथा शहरातील कचरा थेट मनपा आवारात टाकण्याचे आंदोलन हाती घेतले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आला.
पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देण्यात आले. अहिल्यानगर महापालिकेने स्वच्छता अभियानात पाच कोटी रुपयांचे केंद्रस्तरीय बक्षीस मिळवले असले तरी प्रत्यक्षात शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. (Latest Ahilyanagar News)
शहरातील वाढती दुर्गंधी, घाणीबरोबरच मोकाट कुत्री व जनावरांचा त्रास वाढला आहे. अनेक भागांत कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडीच येत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांचा रोष ओळखून काही जण स्वखर्चाने कचरा गोळा करून तो बुरुडगाव येथील डेपोपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करत आहे. ही महापालिका प्रशासनासाठी नामुष्कीची बाब असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी निलेश मालपाणी,सुदाम भोसले, रोहन शेलार, अलतमश जरीवाला, प्रमोद आढाव, भीमराज कराळे, राम वाणी, उमेश भांबरकर, रियाज कुरेशी, परवेज शेख, प्रशांत दरेकर, समीर पठाण आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.