

नगर: आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे लक्ष आता पावसाच्या वेळापत्रकाकडे लागले आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी बियाणे, खत व मशागतीची तयारी सुरू केली आहे. पारंपरिक कृषी पंचांगानुसार यंदा 8 जूनपासून मृग नक्षत्रात मान्सूनची सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आर्द्रा व पुष्य नक्षत्रात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. पंचांग अभ्यासकांच्या माहितीनुसार, आज सोमवार (दि.25) पासून रोहिणी नक्षत्रास प्रारंभ होत आहे. या काळात उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे.
त्यानंतर 8 जूनपासून सुरू होणाऱ्या मृग नक्षत्रात पावसाची सुरुवात होऊ शकते. 22 जून ते 6 जुलैदरम्यान असलेल्या आर्द्रा नक्षत्रात समाधानकारक पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे. जुलै महिन्यातील पुनर्वसू व पुष्य नक्षत्र शेतीस पोषक मानले जात आहे. खरीप पिकांच्या वाढीस या काळातील पाऊस महत्त्वाचा समजला जातो.
ऑगस्ट महिन्यातील आश्लेषा नक्षत्रात काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सप्टेंबरनंतर पावसाचा जोर कमी होत जाऊन हस्त व चित्रा नक्षत्रात परतीच्या पावसाची शक्यता राहणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक अंदाजांवर अवलंबून न राहता हवामान खात्याच्या अधिकृत अंदाजानुसार पेरणी व शेती नियोजन करावे, असे आवाहन केले आहे.
असे आहे वेळापत्रक
नक्षत्र - कालावधी
रोहिणी: 25 मे ते 8 जून
मृग: 8 ते 22 जून
आर्द्रा: 22 जून ते 6 जुलै
पुनर्वसू: 6 ते 20 जुलै
पुष्य: 20 जुलै ते 3 ऑगस्ट
आश्लेषा: 3 ते 17 ऑगस्ट
मघा: 17 ते 30 ऑगस्ट
पूर्वा: 30 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर
उत्तरा: 13 ते 27 सप्टेंबर
हस्त: 27 ते 10 ऑक्टोबर
चित्रा: 10 ते 23 ऑक्टोबर
स्वाती: 23 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर