

कोळपेवाडी: पर्जन्यछायेखाली असलेल्या कोपरगाव मतदार संघातील मोजक्याच गावांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र होते. यामुळे कमी पर्जन्यमान किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान होवूनही नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नव्हता.
या पार्श्वभूमीवर कोपरगाव मतदार संघात जास्तीत- जास्त स्वयंचलित हवामान केंद्र बसवावेत, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी लावून धरली होती. अखेर त्या मागणीला यश आले आहे. कोपरगाव तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आता स्वयंचलित हवामान केंद्र बसविले जाणार आहे, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली. (Latest Ahilyanagar News)
कोपरगाव मतदार संघ पर्जन्यछायेखाली येतो. येथे पर्जन्यमान नेहमीच कमी असते. यामुळे अतिवृष्टी किंवा कमी पर्जन्यमान होवूनही शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळण्यात अडचणी येत होत्या. शासनाच्या विविध योजनांसह अनुदानाचा लाभ नुकसानग्रस्त शेतकर्यांना मिळत नव्हता.
यामुळे स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या वाढवावी, यासाठी आमदार आशुतोष काळे यांचा सतत पाठपुरावा सुरु होता. ग्रामपंचायतस्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने संयुक्त घेतलेला पुढाकार शेतकर्यांसाठी महत्वाचा निर्णय आहे.
हवामानाची अचूक माहिती, हवामानासह कृषी विषयक सल्ला व मार्गदर्शन, नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने आता आवश्यक माहिती मिळणार आहे. यामुळे अतिवृष्टी, पूर किंवा दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे होणार्या नुकसानीपासून एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही. याबद्दल शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. आमदार काळे यांचे त्यांनी आभार मानले.
आमदार काळेंची राज्यात पहिली मागणी!
कोपरगाव तालुक्यातील 6 मंडलामध्ये एकूण 6 स्वयंचलित हवामान केंद्र अस्तित्वात आहेत, परंतू ही संख्या नगण्य असल्यामुळे पिक विम्याचे निकष लावताना अडचण निर्माण होत होती. याबाबत आमदार काळे यांनी, 2019 मध्ये निवडून येताच, कोपरगाव तालुक्यात स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या वाढवावी, अशी कृषी विभागाकडे राज्यातून सर्वप्रथम मागणी केली होती.
याबाबत तात्कालिन कृषी मंत्री व पालकमंत्री यांच्याकडेदेखील त्यांचा सतत पाठपुरावा सुरु होता. त्याची दखल घेवून, उप मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी 2025 सालचा अर्थसंकल्प मांडताना, ग्रामपंचायतस्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर केला होता. त्याची अंमलबजावणी केंद्र व राज्य शासन संयुक्तपणे करणार आहे. यासाठी केंद्राच्या डब्ल्यूआयएनडीएस प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायतस्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे.