संगमनेर: नागपूरला डिसेंबरमध्ये होणार्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा व्हावा, यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. महिलांचे संरक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे. त्यांच्या केसालाही कोणीही धक्का लावण्याचा प्रयत्न केला, तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला.
आमदार खताळाच्या जनसंपर्क कार्यालयात रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला संगमनेर शहर व तालुक्यातून आलेल्या लाडक्या बहिणींनी आ. खताळ यांना राखी बांधली. (Latest Ahilyanagar News)
संपूर्ण राज्यात प्रेमाच्या नावाखाली अनेक हिंदू युवतींना फसवून अंतर जबरदस्तीने धर्मांतरण करण्यास भाग पाडले जाते. तसेच अनेक महिलांचा शारीरिक मानसिक छळ, मारहाण लैंगिक अत्याचार आणि आत्महत्यासारखे गंभीर प्रकार घडत असून याला आळा घालण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर लव्ह जिहाद विरोधी कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी, यासाठी शासन दरबारी प्रयत्न करा, असे साकडे उपस्थित लाडक्या बहिणींनी आ. अमोल खताळ यांना घातले.
त्यावर आ. खताळ म्हणाले की, धर्माच्या व देशाच्या रक्षणासाठी आपण कधीच मागे राहणार नाही, तर सतत पुढाकार घेत राहू, यासाठी माझ्या या सर्व लाडक्या बहिणीने मला येथून मागे साथ दिली अशीच साथ येथून पुढेही द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हिंदुत्ववादी विचाराने प्रेरित झालेल्या संघटनांनी एकत्रित येत संपूर्ण राज्यात हिंदुत्वाला एक वेगळी चेतना देण्याचे काम केले जात आहे. मागील वेळी काहीच्या मुळे गो-तस्करांनी एका गोरक्षावर हल्ला केला होता. त्यावेळी काही अधिकार्यांचे त्यात हात बरबटलेले होते, त्यामुळे आपण विधानसभेत आवाज उठवून गोमातेचे हप्ते खाणार्यांवर कारवाई करा, अशी मागणी विधानसभेत करत आवाज सुद्धा उठविला होता.
मात्र आता संगमनेरात गो तस्करी बर्यापैकी कमी झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात हिंदुत्ववादी विचाराचे सरकार आहे तसेच राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्याला ताकद दिली आहे त्यामुळे आपण महिला, भगिणीच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
बहिणींना भगवे वस्त्र भेट
संगमनेर शहर व तालुक्यातून आलेल्या शेकडो लाडक्या बहिणींनी लाडके भाऊ आमदार अमोल खताळ यांना राखी बांधली. आपण सुद्धा आपल्या लाडक्या बहिणींना काहीतरी भेट दिली पाहिजे म्हणून आमदार अमोल खताळ यांनी सर्व लाडक्या बहिणींना हिंदुत्वाचे प्रतीक असलेले भगवे वस्त्र देऊन सन्मान केला.