

Radhakrushna vikhe on Sanjay Shirsath
नगर : राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांनी सरकारच्या निर्णयाबाबत जाहीर वक्तव्य करणे उचित नाही. कपात केलेला निधी लाडक्या बहिणींसाठी वापरला जात असेल तर बिघडले कुठे असा सवाल उपस्थित करीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाव न घेता समाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. (Ahilyanagar News Update )
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठकीला झाली. या बैठकीपूर्वी मंत्री विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळविला जात असल्याचे सामाजिक न्याय मंत्री शिरसाठ यांनी जाहीर वक्तव्य केले. याकडे मंत्री विखे पाटील यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयाबाबत जाहीर वक्तव्य करु नयेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच मंत्रिमंडळातील सदस्यांना सूचित केलेले आहे. त्यामुळे त्यांचे वक्तव्य गैरच असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी मुख्यालय किंवा विभागाचे ठिकाण सोडून इतरत्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक झालेली नाही. चौंडीसारख्या ग्रामीण ठिकाणी प्रथमच बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीबाबत जनतेला उत्सुकता आहे. या बैठकीची तयारी जिल्हा प्रशासनाने उत्तम केली आहे.
येत्या दोन दिवसांत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. सोमवारी दोन तीन ठिकाणी गारा पडल्या आहेत. अशा परिस्थितीत देखील बैठक यशस्वीरित्या पार पडेल, असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस पक्षातून होणार्या संभाव्य इन्कमिंगबाबतच्या वक्तव्याकडे लक्ष वेधले असता, मंत्री विखे पाटील म्हणाले, बावनकुळे प्रदेशाध्यक्ष असून, त्यांनी जाहीर केलेली भूमिका तीच आमची भूमिका असणार आहे. काँग्रेसमध्ये आता काही थोडे जणच राहिले आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षात आता राहिलंच काय ? असा खोचक सवाल त्यांनी केला.
यावेळी आमदार काशिनाथ दाते, आमदार विक्रमसिंह पाचपुते, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, नितीन दिनकर, सचिन पारखी, निखिल वारे, विश्वनाथ कोरडे, राहुल झावरे, अंबादास पिसाळ आदी उपस्थित होते.