

खेड: गेल्या वर्षी 25 मे रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे भीमा नदीला आलेल्या पुरात शिंपोरा आणि खेड गावांना जोडणारा लोहकरा पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून, ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकऱ्यांची शेती, रुग्णांची गैरसोय आणि नागरिकांचा दैनंदिन प्रवास यावर गंभीर परिणाम होत असल्याची व्यथा ॲड. दत्ता चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, करपडी फाटा ते बाभूळगाव दुमाला हा मुख्य रस्ताही आष्टी उपसा सिंचन योजनेच्या जड वाहतुकीमुळे पूर्णतः खराब झाला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. ‘या भागात राहताना आम्ही महाराष्ट्रात आहोत की एखाद्या दुर्लक्षित प्रांतात?’ अशी संतप्त भावना व्यक्त केली आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन छेडले होते.
मात्र, प्रश्न मार्गी लागण्याऐवजी आंदोलनकर्त्यांवरच गुन्हे दाखल करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ‘हक्कासाठी लढलो, पण बदल्यात गुन्हे मिळाले,’ अशी खंत व्यक्त केली. पूल वाहून गेल्यानंतर सभापती राम शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली होती.
तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पुलाच्या पुनर्बांधणीसाठी भरीव निधीची मागणी करण्यात आली होती. शिंदे यांनी पुलाच्या तातडीच्या पुनर्बांधणीसाठी सुमारे पाच कोटींच्या अंदाजपत्रकासह प्रस्ताव सरकारकडे सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अद्याप प्रत्यक्षात कामाला सुरुवात न झाल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्व. पवार यांना उद्देशून भावनिक पोस्ट
ग्रामस्थांतर्फे ॲड. दत्ता चव्हाण यांनी स्व. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावनिक पोस्ट लिहित पूल आणि रस्त्याचे कामाबाबत जुनी आठवण पुन्हा व्यक्त केली की, ‘तुम्ही फक्त राजकारणी नव्हता, तर कामासाठी लढणारा माणूस होता. तुम्ही रस्ता आणि पूल पूर्णत्वास नेण्याचा शब्द दिला होता,’ अशा भावना व्यक्त केल्या आहेत.