

राजेंद्र बोरसे
श्रीरामपूरः यावर्षी एकीकडे घाटमाथ्यावर मुसळधार पावसामुळे अनेक धरणे तुडुंब भरली, तर दुसरीकडे त्याच धरणांच्या लाभक्षेत्रात पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे. ऑगस्ट महिना संपला तरी, अनेक भागात समाधानकारक पाऊस पडला नाही.
यामुळे धरणे भरली, पण लाभक्षेत्र कोरडेचं अशी विचित्र आणि चिंताजनक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे खरीप हंगामात तालुक्यात सुमारे ३७ हजार ६४३ हेक्टरवर पेरा झालेल्या पिकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पिके वाचवण्यासाठी आता शेतकऱ्यांच्या नजरा परतीच्या पावसाकडे लागल्या आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यात सुरुवातीच्या दोन महिन्यात फारसा पाऊस पडत नाही. यामुळे सगळी भिस्त परतीच्या पावसावर असते. जिह्यात परतीचा पाऊस नारळी पौर्णिमेनंतर पडतो,परंतू नारळी पौर्णिमा संपून ८ दिवस उलटले तरी, पावसाचा थेंबही न पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. महिन्याभरापासून पावसाने ओढ दिल्याने पिके करपली आहेत.
जमिनीतील ओलावा संपल्यामुळे आणि वाढत्या उन्हामुळे सोयाबीन, कपाशीची फुलगळ सुरू झाली आहे. बागायती समजल्या जाणाऱ्या उसाचीही वाढ खुंटल्याने याचा थेट परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
मोठ्या कष्टाने अन् कर्ज काढून उभ्या केलेल्या पिकाच्या उत्पन्नातून खर्च भरुन निघेल, अशी आशा शेतकऱ्यांनी बाळागली, मात्र ती आता 'मावळती' कडे चालल्याने शेतकऱ्यांना खरीप पिकावर केलेला खर्चही 'डोईजड' झाला आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी चालू वर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला चांगल्या पावसाच्या अपेक्षेवर हंगामात ३७ हजार ६४३ हेक्टरवर पेरणी झाली. कापूस ७०९५ हेक्टर, ऊस ६ हजार ४७६, सोयाबीन १६ हजार ८१७, मूग १७ , उडीद २, तूर १२९, ज्वारी २, बाजरी १३९ तर, मका ६९११ हेक्टरवर पेरणी झाल्याची नोंद आहे.
यंदाचा खरीप हंगाम जवळपास हातातून गेल्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. आता शेतकऱ्यांच्या नजरा परतीच्या पावसाकडे लागल्या आहेत, मात्र परतीचा पाऊसही अपेक्षेप्रमाणे न पडल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. धरणे भरल्याने काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
जायकवाडी धरणातील समाधानकारक पाणीसाठ्यामुळे ‘समन्यायी पाणी वाटपा’चा प्रश्नही तूर्तास मार्गी लागला. ही निश्चितच दिलासादायक बाब आहे, मात्र लाभक्षेत्रातील भूजलपातळीसह जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होताना भविष्यातील पाणीटंचाईकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
पाण्याअभावी शेतीबरोबरच दुग्धव्यवसाय, पोल्ट्री, शेळीपालन व ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामातील नुकसानीनंतर रब्बीची संधीही हातची गेली, तर ग्रामीण भागातील आर्थिक चक्राला मोठा फटका बसू शकतो.
तुषार सिंचनाने पिकांना जीवदान
मशागत, खते, बियाणे, औषधे, मजुरी यावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी खर्च केला. जून-जुलै महिन्यात तालुक्यात पडलेल्या पावसाच्या ओलिवर शेतकऱ्यांनी पेरणी केली, मात्र सुरूवातीपासून तालुक्यात फक्त रिमझिम पाऊस पडला. त्यावरच उगवलेल्या पिकांना शेतकऱ्यांनी तुषार सिंचनाचा वापर करुन, उपलब्ध पाण्यावर पिकांना जीवदान दिले.
तुषार सिंचनाने पिकांना जीवदान
मशागत, खते, बियाणे, औषधे, मजुरी यावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी खर्च केला. जून-जुलै महिन्यात तालुक्यात पडलेल्या पावसाच्या ओलिवर शेतकऱ्यांनी पेरणी केली, मात्र सुरूवातीपासून तालुक्यात फक्त रिमझिम पाऊस पडला. त्यावरच उगवलेल्या पिकांना शेतकऱ्यांनी तुषार सिंचनाचा वापर करुन, उपलब्ध पाण्यावर पिकांना जीवदान दिले.
‘भंडारदरा’तून पिकासाठी आवर्तन सोडा
महिनाभरापेक्षा जास्त कालावधीपासून श्रीरामपूर तालुक्यात पाऊस पडला नाही. ऐन पिक वाढीच्या काळात पिकांना पाण्याचा मोठ्या प्रमाणात ताण बसून, पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. भंडारदरा धरणातून शेती पिकासाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमधून होत आहे.
पावसाची प्रतीक्षा कायम
अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर, भंडारदरा, निळवंडे व मुळा धरणे भरली असली, तरी जिल्ह्याच्या उत्तर- दक्षिण भागातील अनेक गावांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे.