

कोळपेवाडीः निधी मिळवण्यात काडीचाही संबंध नसताना आमदार आशुतोष काळे यांनी आणलेल्या निधीतील कामाचे भूमिपूजन करायचे. केवळ स्वतःच्या नेत्याला खुश करण्यासाठी ज्यांनी जागा दिली त्यांनाच गुंडांकरवी धक्काबुक्की करायची, हा सत्तेचा उन्माद आहे, असे सांगत या घटनेचा निषेध करण्यासाठी बुधवारी (दि.22) झालेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बहिःष्कार टाकण्यात आला.
रविवारी शहरातील सुभद्रानगर येथील श्रीस्वामी समर्थ मंदिर, सभामंडप व सुशोभिकरण कामाच्या भूमिपूजनप्रसंगी सत्ताधारी कोल्हे गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना गुंडांकरवी धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे ज्यांनी सभामंडपासाठी जागा दिली त्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ पदाधिकारी बाळासाहेब आढाव यांनाच धक्काबुक्की करण्यात आली.
सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला. या घटनांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या गौरी पहाडे यांनी राष्ट्रवादी नगरसेवकांच्या उपस्थितीत गौतम बँक सभागृहात पत्रकार परिषद घेत, नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेवर राष्ट्रवादी काँग्रेसने बहिःष्कार टाकल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांनी केलेल्या धक्काबुक्कीचा निषेध व्यक्त केला.
राष्ट्रवादीचे पदाधिकारी सुनील गंगुले म्हणाले की, 5 नंबर साठवण तलावाचे काँक्रीटीकरण केले तसेच नगरपरिषदेने तलाव दुरुस्तीऐवजी चारही तलावांचे काँक्रीटीकरण करावे, अशा सूचना आमदार काळे यांनी प्रशासनाला केल्या आहेत. यासाठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, मात्र विरोधकांकडून याबाबत अपप्रचार केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
विरोधकांकडे बहुमत होते, त्यावेळी 5 नंबर साठवण तलावासह 28 विकासकामांना विरोध करून, या कामांना न्यायालयातून स्थगिती आणली. आता सत्तेचा दुरोपयोग केला जात आहे. आमदार काळे कोपरगाव शहर विकासासाठी निधी आणतात. तुम्हीही निधी आणायचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा कोपरगावकरांना आहे, मात्र निधी आमदार काळेंचा अन् त्याच निधीतील कामाचे भूमिपूजन, उद्घाटन तुम्ही करायचे.
कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करायची, बोलायचे एक आणि करायचे दुसरेच, अशा पद्धतीचे राजकारण विरोधक करीत आहेत, असा आरोप करीत, विरोधकांकडून कोपरगावकर विकासाच्या काय अपेक्षा करणार, असा सवाल सुनील गंगुले यांनी उपस्थित केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
‘आमदार आशुतोष काळे यांनी, कोपरगाव शहर विकासाला प्राधान्य दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेतील शहर विकास विषयांना पाठींबा आहे. यापुढेही राहील, मात्र कोपरगावकरांना त्रास देवून, शहराची शांतता भंग करणाऱ्या विषयांना आमचा पाठींबा नाही. सत्ताधाऱ्यांनी श्रेयासाठी वाद घालण्याऐवजी विकास कामांना महत्व द्यावे. आमदार काळे यांच्या प्रयत्नांतून कित्येक वर्षांचा पाणी प्रश्न अखेर सुटला. गेल्या सहा वर्षांत कोपरगावच्या झालेल्या विकासामुळे नगरसेवक व नगरपरीषद प्रशासनाकडून जनतेला शहरविकासाच्या अपेक्षा आहेत, मात्र त्या पूर्ण होत नाहीत.
- गौरी पहाडे, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेत्या, कोपरगाव.